हृदयसम्राट

हृदयसम्राट

श्रीमद्‌भगवद्‌गीतेत परमेश्वराने शरीररूपी यंत्रात स्वतःचे स्थान हृदयात सांगितले आहे. आत्मज्योती, ज्यामुळे ‘जीवन’ सुरू होते, दृश्‍यमान होते, ते चैतन्य, ती धडकन हृदयात राहून सर्व शरीरभर पसरते व सर्व जीवनाचा पसारा चालवते. परमेश्वर मनुष्याच्या हृदयात राहतो म्हणण्यापेक्षा परमेश्वर हृदयरूपानेच मनुष्यमात्रात राहतो असे म्हणणे अधिक सयुक्तिक होईल. जीवनावरील श्रद्धा कमी झाली, की ओजक्षय होऊ लागतो व ते हृदयस्थ परमेश्वराला आवडण्यासारखे नाही. अर्थात, प्रत्येक वेळी हृदय शस्त्रक्रिया करावीच लागते, असे नाही. ‘बाय पास द बाय-पास’ म्हणजे शस्त्रक्रियेस पर्यायी उपाययोजना करून जगणारे अनेक रुग्ण असतात. एकूण  मनातून व हृदयातून भीती काढून टाकून जीवनावर प्रेम करणे आवश्‍यक आहे.

‘हार्ट अटॅक’ शब्दात हार्ट म्हणजे हृदय तर अटॅक म्हणजे चढाई. पण कोण कोणावर करते ही चढाई? हार्ट अटॅकच्या प्रसंगात सर्व दोष ‘हार्ट’वरच टाकला जातो. हार्टने दगा दिला असे म्हटले जाते, पण खरा दगा आपणच हार्टला दिलेला असतो. नवनीताची उपमा असलेले प्रेमाचे प्रतीक असे हे हृदय खरोखरच लोण्याच्या गोळ्यासारखे मऊ मुलायम, रात्रंदिवस काम करून जीवन फुलवणारे! मेंदू व हृदय दोन्ही वास्तविक सात्त्विक रचनेचे, पण रक्त घेणे व शुद्ध करून परत देणे, त्यासाठी सतत कार्यरत राहणे यामुळे हृदय ठरले राजसिक गुणाचे. संपूर्ण जीवनावर राज्य चालवणारा मेंदू हा जरी सम्राटपदावर आरूढ झाला असला तरी हृदयाने केवळ दोन मिनिटे काम करायचे थांबवले तर, मेंदू अशा स्थितीत जातो की, जेथून परत येता येत नाही. हृदय मात्र काही प्रयत्नांनी काम सुरू करते, पण तोपर्यंत मेंदूचे पराविलंबत्व सिद्ध झालेले असते.

जराशा त्रासाने, थोडे अधिक चालण्याने पाय लगेचच दुखल्याचे कळवतात, पण हृदय, मेंदू हे अवयव मात्र शेवटच्या मिनिटापर्यंत सहन करतात. एवढी तेवढी तक्रार करीत आगावू सूचना सहसा देत नाही, म्हणून हार्ट अटॅकचा, अर्धांगाच्या झटक्‍याचा धसका असतो. श्रीमद्‌भगवद्‌गीतेत परमेश्वराने शरीररूपी यंत्रात स्वतःचे स्थान हृदयात सांगितले आहे. आत्मज्योती, ज्यामुळे ’जीवन‘ सुरू होते, दृश्‍यमान होते, ते चैतन्य, ती धडकन हृदयात राहून सर्व शरीरभर पसरते व सर्व जीवनाचा पसारा चालवते. परमेश्वर मनुष्याच्या हृदयात राहतो म्हणण्यापेक्षा परमेश्वर हृदयरूपानेच मनुष्यमात्रात राहतो असे म्हणणे अधिक सयुक्तिक होईल. सध्या परमेश्वरावरील श्रद्धा कमी झाल्यापासून किंवा परमतत्त्वाचे अस्तित्व नाकारल्यापासून कदाचित हृदयविकार वाढले असावेत.

हार्ट अटॅक येण्यासाठी हृदयविकार हे कारण असतेच. वातज, पित्तज, कफज, सन्निपातज वगैरे हृदयविकाराचे प्रकार असू शकतात. पण अधिक शक्‍यता आर्टरी ब्लॉकमुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी झाल्याने हृदयाचा काही भाग खराब होणे वा हृदयाला होणारा रक्तपुरवठा थांबणे ही असू शकते. अटॅक आल्यानंतर योग, व्यायाम, संगीत, आहार, औषधे घ्यावी लागणारच, पण या परमेश्वरी मंदिराची काळजी व ‘मेंटेनन्स’ आधीच करता येणार नाही का?

हृदय हे प्रेम व ओजाचे मुख्य स्थान असल्यामुळे शृंगाररसाचे सेवन अवश्‍य असावे, पण त्याची मर्यादा ओलांडू नये, जेणे करून वीर्य अभाव व क्‍लैब्य टाळणे शक्‍य होईल. अधून मधून चक्कर येणे, हातपायांचा कंप, मनोभ्रम, छातीत दुखणे, आळस व जबाबदारीपासून दूर पळण्याची वृत्ती ही लक्षणे दिसल्यास सावधान व्हावे. वारंवार कानठळ्या बसवणारे आवाज वा संगीत ऐकू नये, दचकायला होईल किंवा भीती वाटेल असे वागू नये. सर्व गोष्टींविषयी संशयही हृदयविकार वाढवण्यास कारण ठरतो. मनाचे स्थान हृदयाशी जोडलेले असल्यामुळे मानसिक ताण हा तर हार्ट अटॅकचे महत्त्वाचे व शेवटचे कारण असणार आहे. केवळ दुःखामुळेच ताण येतो असे नाही तर, अति आनंदाने उत्तेजना झाल्यासही ताण येतो.

स्वतःविषयी अहंकार नसावा, पण आत्मसन्मान अवश्‍य असावा. जीवनावरील श्रद्धा कमी झाली की ओजक्षय होऊ लागतो व ते हृदयस्थ परमेश्वराला आवडण्यासारखे नाही. सध्या जगात सर्व ठिकाणी भीतीचे वातावरण तयार करून मनुष्यमात्रास सतत ताणाखाली ठेवून स्वतःचा धंदा व फायदा वाढवण्याचे धोरण दिसते. हा ताण पण मधुमेह, रक्तदाब व हृदय विकारास कारणीभूत आहे. एकंदरीत वाढलेल्या संकुचित स्वार्थी वृत्तीने परस्पर संबंध दुरावून येणाऱ्या ताणामुळे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण सध्या वाढते आहे. एकंदरीत कौटुंबिक परस्परसंबंध व पतिपत्नींतील अंतर दुरावून प्रेमभाव कमी झाल्याने भयंकर मानसिक ताण सतत राहिल्याने निरनिराळ्या असाध्य रोगांचे व हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे.

रासायनिक खते व कीटकनाशकांचा अति वापर करून तयार केलेल्या गोष्टी आहारात आल्यास वातवृद्धि होऊन रक्त दूषित होते व शरीराला, रक्तवाहिन्यांना कडकपणा येतो. शिळे, साठवलेले, थंड अन्न-पाणी-पेयांच्या सेवनाने पण आमवृद्धि होऊन कडकपणा येतो. दुपारी न जेवता व रात्री अति जड जेवण्यानेही हृदय विकारांसारख्या रोगांचे प्रमाण वाढत आहे. या प्रकारची अनैसर्गिक शारीरिक व मानसिक जीवनपद्धती स्वीकारून मनुष्यानेच हृदयाला दगा देऊन हार्ट वर अटॅक केला आहे. 

कोणताही हृदयविकार झाला म्हणजे हार्ट अटॅक येतो असे नाही, तरीही उपाययोजना करावी लागतेच. तसेच प्रत्येक अटॅकमुळे मृत्यू येतोच असे नाही. सर्व वैद्यकीय सोयी अगदी लगेच उपलब्ध होऊनही मृत्यूची काही उदाहरणे दिसतात, पण त्याहीपेक्षा अटॅक नंतर फारसा मोठा त्रास न झालेली अनेक उदाहरणे आहेत. अटॅक नंतर आता सर्जरी करावीच लागेल ही भीतीही अनावश्‍यक असू शकते. ‘बाय पास द बाय-पास’ म्हणजे सर्जरीस पर्यायी उपाययोजना करून जगणारे अनेक रुग्ण असतात. एकूण  मनातून व हृदयातून भीती काढून टाकून जीवनावर प्रेम करणे आवश्‍यक आहे.

नियमित व्यायाम, योग, स्वास्थ्यसंगीत, ध्यान, आहार (आयुर्वेद शास्त्राप्रमाणे व्यक्तीच्या प्रकृतीनुसार व षड्रसपूर्ण, चतुर्विध आहार), वेळच्या वेळी अभ्यंग व विशेष पद्धतीने पंचकर्मातील काही चिकित्सा व विशेष हृदय उपचार करून रसायन सेवन करून तरुण राहण्याने हार्ट अटॅकच नाही तर सर्व रोगांपासून दूर राहता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com