इस्लामाबाद : भारतीय हवाई दलाने केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. भारताने जम्मू, अमृतसर, श्रीनगर आणि पठाणकोट येथील विमानतळांवरून प्रवासी वाहतूक बंद केली आहे. पाकिस्ताननेही लाहोर, मुल्तान, फैसलाबाद, सियालकोट आणि इस्लामाबाद येथील विमानतळ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी बंद केली आहेत.
यासंदर्भात पाकिस्तानमधील 'जिओ टीव्ही'ने वृत्त दिले आहे. त्यांनी लाहोर विमानतळाच्या व्यवस्थापकाच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. 'पुढील आदेश मिळेपर्यंत या पाचही विमानतळांवरील वाहतूक पूर्ण बंद ठेवली जाणार आहे. चीनमधून आलेले एक विमानही परत पाठविण्यात आले आहे. त्या विमानास पाकिस्तानमध्ये उतरण्याची परवानगी देण्यात आलेली नाही', असे त्या व्यवस्थापकाने सांगितले.
भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये हल्ला करून 'जैश ए महंमद'चे कंबरडे मोडले. त्यानंतर भारताने कूटनितीने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवरही एकाकी पाडले. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने आज (बुधवार) भारतीय हद्दीत घुसखोरी करून बॉम्बहल्ला केला. या कुरापतीस भारतीय सुरक्षा यंत्रणांनी चोख प्रत्युत्तर दिले आणि घुसखोरी केलेले एक विमान पाडले. त्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या देशात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.