डोकलाम: चीनची पुन्हा धमकी; भारताचाही ठाम नकार

डोकलाम: चीनची पुन्हा धमकी; भारताचाही ठाम नकार

बीजिंग: भारतानेच डोकलाममधून विनाअट आपले लष्कर माघारी घ्यावे, त्याशिवाय तेथील तणाव निवळणार नाही, असा इशारा देत चीनने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि चीनचे समकक्ष अधिकारी यांग जेईची यांच्यात 28 जुलै रोजी झालेल्या बैठकीची माहिती देताना चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने प्रथमच हे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, भारतानेही कोणत्याही परिस्थितीत आमचे लष्कर माघार घेणार नसल्याचे सांगत चीनला सुनावले आहे.

या वेळी उभय देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये ब्रिक्‍स सहकार्य, द्विपक्षीय संबंध आणि अन्य मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. मागील महिन्यात चीनमध्ये झालेल्या ब्रिक्‍स देशांच्या संमेलनात दोवाल हेदेखील सहभागी झाले होते. विशेष म्हणजे दोवाल हे भारत आणि चीनमध्ये सीमावादावर चर्चा करण्यासाठी नेमण्यात आलेले प्रतिनिधी आहेत.

डोकलाममध्ये चीनने रस्त्यांच्या उभारणीस सुरवात केल्यानंतर या वादाला तोंड फुटल्याचे दोवाल यांनी सांगितले; पण चीननेही आपला पूर्वीचा पवित्रा कायम ठेवला. दोवाल आणि यांग यांच्यातील चर्चेत कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

भारताची भूमिका
भारतानेही डोकलामबाबतची आपली भूमिका याआधीच स्पष्ट केली आहे. सुरवातीस दोन्ही देशांनी आपआपले सैन्य माघारी घ्यावे, त्यानंतर चर्चा करावी, असे मत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मांडले होते. डोकलाममध्येही चीनने रस्त्यांचे बांधकाम पूर्ण केल्यास भारताचा ईशान्येकडील राज्यांशी असणारा संबंध तुटू शकतो, अशी भीती सरकारला सतावते आहे.

चीनचा तथ्ये मांडणारा अहवाल
दोवाल यांच्याशी चर्चा करताना चीनने आपली बाजू ठामपणे मांडली. भारताने चीनचे सार्वभौमत्व, आंतरराष्ट्रीय कायदे यांचे पालन करावे, अशी विनंती यांग यांनी दोवाल यांच्याकडे केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने पंधरा पानांचा तथ्ये मांडणारा अहवाल आपल्या संकेतस्थळावर पोस्ट केला असून, यामध्ये डोकलाममधील तणावाची कारणे स्पष्ट करण्यात आली आहेत.

घुसखोरीचा ठपका
डोकलाममधील चिनी घुसखोरीवर भुताननेही नाराजी व्यक्त केल्याचे समजते. ज्या भागामध्ये रस्ते उभारले जात आहे, तो प्रदेश आमच्या मालकीचा असून, करारान्वये या भागामध्ये चीनने जैसे थे स्थिती ठेवणे आवश्‍यक असल्याचे भुतानने म्हटले आहे. चीनच्या तथ्यदर्शक अहवालामध्ये 18 जून रोजी भारतीय सैनिकांनी चिनी हद्दीत शंभर मीटरपर्यंत घुसखोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com