बीजिंग - भारताने चीनमधील "वन बेल्ट वन रोड' (ओबोर) परिषदेवर बहिष्कार घातल्याबद्दल आज चीन सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली. या परिषदेबाबत कोणती "अर्थपूर्ण चर्चा' भारताला अपेक्षित आहे, असा सवालही चीनने विचारला.
"ओबोर' प्रकल्पाबाबत चीनने अर्थपूर्ण चर्चा करणे अपेक्षित आहे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी काल (ता. 15) म्हटले होते. त्यांच्या या विधानावर आणि भारताच्या भूमिकेवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी आज टीका केली. ते म्हणाले, की या प्रकल्पाला चार वर्षांपूर्वी सुरवात झाल्यापासून आम्ही सल्लामसलत, संयुक्त योगदान आणि सर्वांना फायदा याच धोरणाचा पुरस्कार केला आहे. त्यामुळे भारताला आणखी कोणती सविस्तर चर्चा अपेक्षित आहे? कोणत्या प्रकारची चर्चा अर्थपूर्ण चर्चा ठरेल? चीनने कोणत्या प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, हेदेखील भारताने स्पष्ट करावे. या प्रकल्पाचा सर्व व्यवहार खुला आहे. या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय समुदायाचा मिळालेला प्रतिसादही सर्वांनी पाहिला आहे, असेही हुआ म्हणाले.
या प्रकल्पाचा भविष्य अतिशय उज्ज्वल आहे. आगामी काळातील बदलांसाठी हा प्रकल्प अत्यंत अनुकूल असून, ओबोर प्रकल्पामध्ये भारताचे कायमच स्वागत आहे.
- हुआ चुनयिंग, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते
|