चीनकडून नागरिकांना पुन्हा सावधगिरीचा इशारा

चीनकडून नागरिकांना पुन्हा सावधगिरीचा इशारा

भारतात प्रवास करणे टाळण्याची सूचना

बीजिंग : चीनने भारतात प्रवास करणाऱ्या चिनी नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. मागील दोन महिन्यांतील हा दुसरा सावधगिरीचा इशारा आहे. भारतात रेल्वे अपघात, नैसर्गिक आपत्ती, वारंवार साथीचे रोग पसरत आहेत, असे चीनने म्हटले आहे.

चीनच्या भारतातील दूतावासाने हा इशारा जाहीर केला आहे. डोकलाममधील लष्करी पेचावरून भारत आणि चीन यांच्या संबधांत तणाव निर्माण झाला आहे. यावरून चीनने भारताविरोधात अपप्रचार करण्याची मोहीम सुरू केली आहे. दूतावासाने इशाऱ्यात म्हटले आहे, की चिनी नागरिकांनी व्यक्तिगत सुरक्षेला महत्त्व देत भारतात अकारण प्रवास करणे टाळावे. नागरिकांना भारतात प्रवास करताना योग्य कागदपत्रे जवळ बाळगावीत. तसेच, तेथील सर्व धार्मिक प्रथांचे पालन करावे. भारतातील प्रवासाच्या कार्यक्रमाची कुटुंबीय, सहकारी आणि मित्रांना कल्पना द्यावी.

रेल्वे अपघातावर भर
आठवड्यात झालेल्या रेल्वे अपघातावर इशाऱ्यात भर देण्यात आला आहे. भारतात सातत्याने रेल्वे अपघात घडत असून, नैसर्गिक आपत्ती येत आहेत. याचबरोबर साथीचे रोगांचा प्रसार सुरू आहे, असे यात नमूद केले आहे. हा इशारा या वर्षीच्या अखेरपर्यंत लागू असणार आहे. याआधी 7 जुलैला चीनने पहिला सावधगिरीचा इशारा नागरिकांना दिला होता आणि तो एक महिन्यासाठी होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com