नवी दिल्ली : जैशे महंमदचा प्रमुख मसूद अझरवरील बंदीच्या प्रस्तावाला सातत्याने अडथळा आणल्याबद्दल भारताने आज चीनकडे अधिकृतपणे निषेध नोंदविला आहे. दिल्लीमधील चीनच्या दूतावासाकडे आणि बीजिंगमधील भारतीय दूतावासाने राजनैतिक तक्रार दाखल केली आहे.
आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करून त्याच्यावर बंदीची मागणी करणारा प्रस्ताव भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमध्ये 19 जानेवारीला मांडला होता. या समितीमधील 15 सदस्यांपैकी चीनवगळता सर्व 14 सदस्यांनी प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला होता. मात्र, चीनने तांत्रिक मुद्दा पुढे करत प्रस्तावाला विरोध केला होता. चीनने हा प्रकार पूर्वीही केला होता.
"चीनने त्यांचे धोरण बदलले, तर सार्वमत शक्य आहे, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली आहे. या मुद्यावर भारत आणि चीनने द्वीपक्षीय चर्चा करावी, असेही चीनचे मत आहे. मात्र, राष्ट्रसंघाच्या जागतिक दहशतवादी संघटनांच्या यादीत नाव असलेल्या जैशे महंमदच्या प्रमुखावरील बंदीसाठी हा प्रस्ताव असल्याने हा द्वीपक्षीय प्रश्न असू शकत नाही, असे स्वरूप यांनी स्पष्ट केले.
|