नवी दिल्ली - जैश-इ-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कुख्यात म्होरक्या मसूद अझर याला संयुक्त राष्ट्रसंघाकडून दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांस चीनचा पाठिंबा मिळेल, अशी आशा अजूनही असल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज (मंगळवार) व्यक्त केले.
गेल्या 30 डिसेंबर रोजी भारताने संयुक्त राष्ट्रसंघामध्ये यासंदर्भातील मांडलेल्या प्रस्तावामध्ये चीनने खोडा घातला होता. चीनच्या या आडमुठ्या भूमिकेसंदर्भात भारताकडून संताप व्यक्त करण्यात आला होता.
दहशतवादासंदर्भातील चीनचे धोरण दुटप्पी असल्याचे या भूमिकेमधून स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया भारताकडून व्यक्त करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रसंघाकडून यासंदर्भातील औपचारिक घोषणा झाल्यास मसूद याची संपत्ती गोठविण्याबरोबरच त्याच्या प्रवासावरही निर्बंध येणार आहेत. मात्र निव्वळ चीनमुळे हा प्रस्ताव मंजूर होऊ शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, दहशतवाद्यांना शासन करण्यासाठी आवश्यक असलेले राजनैतिक प्रयत्न यापुढेही सुरुच ठेवण्याचा निर्धार भारताकडून व्यक्त करण्यात आला आहे.
|