न्यूयॉर्क : ‘पाकिस्तान हा दहशतवादाचा सर्वांत मोठा पाठिराखा आणि सूत्रधार देश असूनही तो स्वत:ला पीडित देश म्हणवून घेतो. या देशाने हिंदू, ख्रिश्चन, शीख आणि बौद्धांसह सर्व अल्पसंख्याकांच्या हत्या थांबवाव्यात,’ अशी कठोर शब्दांतील टीका आज भारताने केली. संयुक्त राष्ट्रांमध्ये वारंवार काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले.
संयुक्त राष्ट्रातील भारताच्या प्रतिनिधी डॉ. काजल भट यांनी भारताची भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की,‘‘संयुक्त राष्ट्राच्या प्रत्येक सदस्याने आंतरराष्ट्रीय नियमांचे आणि जबाबदारीचे पालन करणे आवश्यक आहे. पाकिस्तानने मात्र खोटे आरोप करण्यासाठी या व्यासपीठाचा वापर केला आहे. हाच देश दहशतवाद पोसणारा आणि कारवायांचा सूत्रधार आहे. त्यामुळे त्यांचे सर्व आरोप पुन्हा एकदा फेटाळून लावत आहोत.’’ दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान दोषीच असल्याचेही भारताने सांगितले. पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत भारतावर आरोप केले होते.
"दहशतवाद ही अजूनही जागतिक समस्या असून तिचा नव्या क्षेत्रांमध्येही विस्तार होत आहे. दहशतवाद्यांनी त्यांची क्षमता वाढविली असून त्यांच्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानही येत आहे. त्यामुळे या समस्येविरोधात एकत्र येऊन कृती करणे अत्यावश्यक आहे."
- डॉ. काजल भट, भारतीय राजनैतिक अधिकारी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.