पाकिस्तानने दहशतवादी घडविले: सुषमा स्वराज

Sushma Swaraj
Sushma Swaraj

न्यूयॉर्क : "भारताने शास्त्रज्ञ, डॉक्‍टर, इंजिनिअर घडविले; तर पाकिस्तानने दहशतवादी घडविले, असा हल्लाबोल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केला. पाकिस्तानने दहशतवादावर पैसा खर्च करण्यापेक्षा विकासावर खर्च केल्यास त्यांचे कल्याण होईल,'' असा सल्लाही स्वराज यांनी या वेळी दिला. 

संयुक्त राष्ट्रसंघाच्या 72 व्या महासभेत सुषमा स्वराज यांनी दहशतवादसह प्रमुख समस्यांवर भाष्य केले. निष्पाप लोकांचे रक्त सांडणाऱ्या पाकिस्तानने भारताला माणुसकीचे धडे शिकवण्याची गरज नाही, असे सांगत स्वराज म्हणाल्या,

"पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी भारताच्या विरोधात गळा काढत होते, तेव्हा इथे बसलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हाच प्रश्न पडला होता, की हे कोण बोलते आहे बघा? पाकिस्तानचे राष्ट्रपुरुष कायदे आझम महंमद अली जिना यांनी शांती व मैत्रीचा संदेश दिल्याचे पंतप्रधान शरीफ म्हणाले होते. जिनांनी शांती व दोस्तीचा संदेश दिला की नाही, हे इतिहासाला माहीत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैत्रीचे पर्व निर्माण केले, हे जगाला ठाऊक आहे. भारत व पाकिस्तान एकाचवेळी स्वतंत्र झालेले देश आहेत, मात्र सध्या भारत आणि पाकिस्तानची ओळख पूर्णत: वेगळी आहे. भारताने दहशतवादाशी सामना करताना विकासाचे उद्दिष्टही साध्य केले. भारताने जगाच्या पाठीवर आयटी सुपरपॉवरची ओळख बनविली आहे, तर दहशतवादाला खतपाणी घालणारा देश म्हणून पाकिस्तानची ओळख आहे. 

एकजुटीने लढण्याची आवश्‍यकता 
स्वराज म्हणाल्या, की विश्‍व अनेक समस्यांचा सामना करत आहे. जगभरात हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. दहशतवादाच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे दहशतवादाच्या मुळावर घाव घालण्याची वेळ आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सर्व सदस्य देश दहशतवादाविरोधात लढण्याचा संकल्प सोडतात. मात्र ज्या वेळी निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा मात्र माघार घेतात. आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी व्यापक परिषदेचे (सीसीआयटी) सर्व कायदे संयुक्त राष्ट्रसंघात मान्य होतात, मात्र दहशतवादाची व्याख्या अजूनही करता येत नाही. दहशतवादाविरोधात वेगवेगळ्या दृष्टीने लढण्याचे सोडून एकजुटीने लढण्याची आवश्‍यकता आहे, असे आवाहनही स्वराज म्हणाल्या. 

टिकाऊ विकासाचे लक्ष्य 
स्वराज म्हणाल्या, की गरिबी दूर करण्यासाठी टिकाऊ विकास हे भारताचे पहिले लक्ष्य आहे. भारत सरकारने निर्माण केलेल्या योजना या गरिबांना सामर्थ्यशाली बनविणाऱ्या आहेत. मुद्रा योजनेअंतर्गत सत्तर टक्‍क्‍यांपेक्षा अधिक कर्जाचे महिलांना वाटप करण्यात आले आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब महिलांना मोफत गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले असल्याचेही स्वराज यांनी सांगितले. ज्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांचेही शून्य खाते तयार करण्यात आले आहे. याचसोबत तीस कोटी लोकांना मिशन मोडसारख्या योजनांना बॅंकांना जोडण्याचे काम केले आहे. 

पॅरिस कराराशी कटिबद्धता 
भारताने पॅरिस करारावर कटिबद्ध असल्याचे स्वराज यांनी नमूद केले. जगभरात जल व वायू प्रदूषणासंबंधी समस्या निदर्शनास येत आहेत. अशावेळी पॅरिस कराराची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अन्यथा, नैसर्गिक कोपाला जगाला सामोरे जावे लागेल. विकसित देशांनी अविकसित देशांना तंत्रज्ञान सहकार्य करण्यावरही विचार करावा. याचसोबत कर आधारित तडजोडींवर विकसित देशांनी लक्ष्य केंद्रित करावे, असे स्वराज म्हणाल्या. 

सुषमा स्वराज यांनी भारताची भूमिका अत्यंत योग्यरीतीने मांडून जागतिक व्यासपीठावर देशाची मान उंचावली आहे. स्वराज यांनी आपल्या भाषणातून दहशतवादाविरोधात अत्यंत स्पष्ट संदेश दिला आहे. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com