चेतना तरंग : ताणाला घाबरू नका!

प्राचीन काळी महर्षी पतंजलींनी मनाचा बचाव करण्यासाठी मैत्री, करूणा, प्रसन्नता किंवा उदासीनता यांचा वापर कसा करावा, हे अतिशय सूचकपणे सांगितलेले आहे.
sri sri ravi shankar
sri sri ravi shankarSakal

प्राचीन काळी महर्षी पतंजलींनी मनाचा बचाव करण्यासाठी मैत्री, करूणा, प्रसन्नता किंवा उदासीनता यांचा वापर कसा करावा, हे अतिशय सूचकपणे सांगितलेले आहे. हे चार प्रकारचे व्यवहार तुमच्या मनात ठेवा. त्यांचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. या अभिव्यक्ती तुमच्यातच आहेत, असे मानून चाला. त्यांना तुमच्या हृदयातच राहून द्या. जशी गरज असेल त्याप्रमाणे त्या प्रकट होतील. त्या सहजपणे प्रकट व्हायला लागल्यावर तुम्हाला काय फायदा होईल? तुमचे मन प्रसन्न राहील. मनात शांती राहील, त्यामुळे मनात कृपेचा भाव जागृत होईल, ती कृपा मग प्रवाहित होऊन तुमच्या सान्निध्यातल्या सगळ्यांवर बरसायला लागेल.

प्रश्न : मी तणावमुक्त कसा बनेन?

गुरुदेव : ताण-तणावापासून मुक्त होण्याचा जाणूनबुजून प्रयत्न करू नका किंवा त्यामुळे घाबरूनही जाऊ नका. ताणतणाव असतील तर असू द्या, त्यांना घाबरल्याने तुम्ही आणखीन तणावग्रस्त बनाल. पहिल्यांदा सायकल चालवायला शिकताना, ‘‘मी एखाद्या दगडावर आपटणार नाहीना?’’ असे तुमच्या मनात आले की खरोखरच तुम्ही दगडावर जाऊन आदळाल. तणाव असले तर असू द्या. त्याने काय होणार आहे? ताणतणाव हे आपल्या जीवनाचे अविभाज्य भागच आहेत. जीवनात कधी ताण येतात, तर कधी प्रसन्नता येते. या सगळ्यांना स्वीकारून पुढे मार्गस्थ व्हा. भूतकाळाचे चिंतन करण्यात निरर्थक वेळ दवडू नका किंवा दुसऱ्यांचे दोष काढत बसू नका. असल्या गोष्टी सोडून द्या. तुम्हाला काय वाटते? तुमच्या घरी कचरा टाकायला एक कुंडी असते. तुम्ही घरातला सगळा कचरा त्यात टाकता. परंतु ती कचराकुंडी तुमच्या घरात नसेल, तर सगळा कचरा घरभर विखुरलेला राहील. म्हणूनच कचरा टाकण्यासाठी घरात एखादी जागा हवी म्हणजे घर स्वच्छ राहील. त्याप्रमाणेच जीवनात ताण-तणाव निर्माण झाले, काही त्रुटी निर्माण झाल्या तर त्याचा फारसा बाऊ न करता त्यांना एका बाजूला करा आणि जीवनात पुढे चाला. त्या कचरा कुंडीत डोके घालत बसू नका.

प्रश्न : माझ्या कौटुंबिक व्यवसायामुळे कायमचे ताणतणाव, खूप कष्ट मला सहन करावे लागतात. अशा परिस्थितीत मी काय करू?

गुरुदेव : एक लक्षात घ्या. कोणतेही कार्य तणावमुक्त नाही. एकतर तुम्ही ताणतणाव तुमच्यासाठी निर्माण करता किंवा इतरांसाठी निर्माण करता. ताण तुमच्या मनोवृत्तीवर अवलंबून असतात. जीवनात येणाऱ्या आव्हानांकडे ताण म्हणून बघायचे, की त्या आव्हानांचा स्वीकार करून आत्मविश्वासाने त्यावर मात करायची हे तुम्ही ठरवायचे असते. तुमचे भलेच होईल याची खात्री तुमच्या मनात असली की तुमचे मन निरभ्र राहते. व्यवसायात नेहमीच चढ, उतार येत असतात. ते येतील आणि जातील. व्यवसाय भावनेच्या भरात नाही, तर बुद्धीने करायचा असतो. आणि दानधर्म बुद्धीने नाही, तर हृदयातून करायचा असतो. सेवा नेहमी हृदयातून करायची असते आणि व्यवसाय डोक्याने करायचा असतो. या दोघांत तोल सांभाळण्याचे काम मात्र शहाणपणाने करायचे असते. एखाद्या भावुक व्यक्तीला व्यवसाय करणे कठीण जाते, हे मी समजू शकतो. व्यापारात भावनेच्या भरात वाहून चालणार नाही, पण भावनांना आवर घालण्याची सवय तुम्हाला लाऊन घेतली पाहिजे. तुम्हाला व्यावहारिक होणे जरुरीचे आहे. त्याचप्रमाणे दानधर्म रिक्त हस्ताने होत नाही. देण्यासाठी काहीतरी तुमच्या जवळ असणे आवश्यक असते. तुमच्याकडे देण्यासारखे काहीच नसल्यास इतरांना तुम्ही काय देणार? पण ईश्वरावर तुमचा भरवसा असेल, वैश्विक नियमांवर तुमचा विश्वास असेल तर बाकी कसली काळजी करण्याचे कारण नाही. सगळ्या गोष्टी आपोआप घडत जातील. ठीक आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com