नागपूर : मागील दोन वर्षात कोरोनामुळे नकारात्मकता, चिंताजनक बातम्या, यांच्यामुळे नैराश्य (डिप्रेशन) वाढलं. जवळचा माणूस सोडून गेला, आता काय करायचे जगून असे आत्महत्येचे विचार मनात येतात. त्यातच एक लाख व्यक्तीमध्ये १० जण आत्महत्या (Suicide) करतात अशी माहिती पुढे आली आहे. अशा घटनांवर मात करण्यासाठी सकारात्मक संवाद महत्त्वाचा आहे, असा सूर मानसोपचार तज्ज्ञांशी साधलेल्या संवादातून पुढे आला.
शुक्रवारी १० सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाच्या पर्वावर मानसोपचार तज्ज्ञांशी संवाद साधला. २०१९ च्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार भारतात रोज सरासरी ४०० आत्महत्या होतात. एक लाख लोकसंख्येमागे १० आत्महत्या ही गंभीर बाब आहे. ग्रामीणपेक्षा शहरात आत्महत्या अधिक होतात. वाढत्या स्पर्धेसोबत होणारे शहरीकरण देखील आत्महत्येसाठी जबाबदार ठरत आहे.
पुरुषांच्या आत्महत्या अधिक -
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. मात्र आत्महत्येचा प्रयत्न करण्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अधिक आहे. आत्महत्या केलेल्यांपैकी ६० ते ८० टक्के व्यक्तींनी यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला असतो. तीव्र नैराश्य, स्किझोफ्रेनिया, व्यसनाधिनता, व्यक्तिगत व्यंगदेखील आत्महत्येसाठी कारणीभूत ठरू शकतात. योग्य तज्ज्ञांचा सल्ला आणि मित्रांशी संवादातून आत्महत्येसारखे विचार दूर ठेवण्यास मदत होते, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुशील गावंडे आणि डॉ. श्रीकांत निंभोरकर यांनी व्यक्त केले.
आत्महत्येची पूर्व लक्षणे
नेहमी उदास राहणे
एकलकोंडेपणा, एकटे राहणे
स्वतःला ओझं समजणे
मनाला असह्य वेदना होणे
नकारात्मक विचार करणे
छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड
मरणाच्या गोष्टी करणे
स्वतःला हानी पोहचविण्याचा प्रयत्न
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.