
Jalgaon News : ...तर शिल्लक निधी पालिकांकडे वळवणार; जिल्हाधिकारी मित्तल
जळगाव : जिल्हा वार्षिक योजनांतर्गत विविध शासकीय विभागांना निधी (Fund) वितरित केला जातो. (Collector warned various govt departments that if funds are not spent by March 20 it will be diverted to municipalities jalgaon news)
हा निधी ३१ मार्चअखेर पूर्ण खर्च करण्याच्या सूचना असतानाही २०२१-२२ या कालावधीपासून वेळोवेळी जिल्हा परिषदेला मिळालेल्या १९५ कोटींच्या निधीपैकी केवळ ८९ कोटींचा खर्च झाला असून, १०७ कोटींचा निधी अखर्चित असल्याची धक्कादायक माहिती बैठकीच्या माध्यमातून समोर आली आहे.
जिल्हा परिषद निधी खर्चात मागे असल्याचे चित्र आहे. हा निधी २० मार्चपर्यंत खर्च न झाल्यास तो निधी पालिकांकडे वळविण्याचा इशारा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शुक्रवारी (ता. १०) दिला. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये सध्या ‘मार्च एण्ड’ची धावपळ सुरू आहे. आर्थिक वर्षात प्राप्त झालेला निधी १०० टक्के खर्च करण्यासाठी अवघे २० दिवस शिल्लक आहेत.
त्यामुळे नेमका निधी किती खर्च झाला? याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी मित्तल यांनी जिल्हा नियोजन विभागांतर्गत विविध शासकीय विभागांची बैठक घेतली. बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी प्रताप पाटील, महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपवन संरक्षक विवेक होशिंग, जिल्हा परिषदेचे अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
जिल्ह्याचा खर्च केवळ ४१ टक्के
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील असे निधीचे वितरण केले जाते. आर्थिक वर्षात ३२४ कोटी निधी वितरित केला असून, त्यापैकी ८ मार्चअखेर २४७ कोटींचा निधी खर्च झाला आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी ४१.३१ टक्के खर्च झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी विभागनिहाय निधी खर्चाचा आढावा घेतला. यात ज्या विभागांचा निधी अद्याप खर्च झालेला नाही, त्या विभागांना २० मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिला. २० मार्चपर्यंत निधी पूर्ण खर्च न झाल्यास तो इतर विभागांकडे वळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी मित्तल यांनी बैठकीत सांगितले.