
Inspirational News : संस्कार उपनयनाचा... आदर्श सामाजिक जाणिवेचा; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप
Jalgaon News : सोळा संस्कारांत उपनयन संस्कार अर्थात, मौंजीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आचार्य म्हणून मुलांना पित्याकडून दीक्षा व संस्काराची शिदोरी दिली जाते, त्याचा हा दिवस. (during children Upanayana Sanskar Director of Sakharam Joshi Pratishthan provide educational materials to needy students jalgaon news)
एरवी हा संस्कार सोहळा म्हणून साजरा होत असताना, लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानच्या संचालकांनी मात्र आपल्या मुलांच्या मौंजीला गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन सामाजिक जाणिवेचा अनुकरणीय संदेश दिला.
लोकशाहीर सखाराम महाराज यांच्या शाहिरीचा वारसा त्यांचे पुत्र दिलीप जोशी यांनी त्याच दिमाखात चालवला.
आता दिलीप जोशी यांचे पुत्र संग्राम व संदीप ही दोघेही लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. ‘रोड सायडर’ अर्थात, रस्त्यावरील मनोरुग्णांच्या पुनवर्सनाचे महत्त्वपूर्ण कार्य प्रतिष्ठानने हाती घेतले असून, आतापर्यंत जळगावातील नऊ मनोरुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांचे पुनर्वसन केले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मौंजीला सामाजिक कार्याची जोड
प्रतिष्ठानचे कार्य पाहणाऱ्या संग्राम जोशी यांचे पुत्र दिवीज व अद्वय यांचा उपनयन संस्कार सोहळा अर्थात, मौंजीचा कार्यक्रम रविवारी (ता. २१) एमआयडीसीतील हॉटेलमध्ये झाला. जोशी कुटुंबीयांनी मौंजीबंधनात अनोखा उपक्रम राबविला. समाजातील गरीब, गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही शिकण्याचा हक्क, अधिकार आहे, म्हणून अशा पाच विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून देण्यात आले.
त्यात स्कूल बॅग, वह्या, पुस्तके व अन्य साहित्यांचा समावेश आहे. मौंजीच्या सोहळ्यासाठी एकत्रित जमलेल्या आप्तेष्टांना ‘पीपीटी’द्वारे लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याची चित्रफीत दाखविण्यात आली. मौंज सोहळ्यावर अधिक खर्च न करता जोशी कुटुंबीयांनी राबविलेल्या या आदर्श उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.