
Jalgaon Rain News : खरीप हंगामात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत. चांगला पाउस सुरू असल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. खरिपातील कापसाला याचा मोठा फायदा होऊन अपेक्षित उत्पादन येण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.
‘अलनिनो’च्या प्रभावामुळे यंदा पावसाने ऑगस्टमध्ये मोठी दडी मारली होती. ऑगस्टमध्येच ऑक्टोबर हिटचा अनुभव येत होता; तर पिकांना पाणी नसल्याने पिके सुकू लागली होती. मात्र, सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होत आहे. दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने नद्या-नाले वाहू लागले आहेत. (Increase in cotton production possible due to return rain jalgaon news)
गिरणा, वाघूर, हतनूर जलाशयात साठा वाढला आहे. यामुळे सिंचनाला मोठा फायदा होईल. जमिनीची भूक भागल्याने पाणीसाठाही होत आहे. पिकांवरील रोगराई परतीच्या पावसाने धुवून निघाली. याचा फायदा खरिपाच्या पिकांना व आगामी हंगामातील रब्बी पिकांना होणार आहे.
ऑगस्टमध्ये पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांची बिकट स्थिती होऊन, उत्पादनात ५० टक्के घटीची शक्यता होती. आताच्या पावसाने उत्पादनातील तूट काही अंशी भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. आता पितृपक्षात कडक ऊन पडले तरी कापसाला बोंडे येऊन कापूस फुटेल. परिणामी, विजयादशमी (दसरा)पर्यंत हंगामातील कापूस बाजारात येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सात ते आठ हजारांचा भाव अपेक्षित
गतवर्षी कापसाला अपेक्षित भाव न मिळाल्याने अद्यापही गतवर्षाचा दहा ते वीस टक्के कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. सध्या बागायती कपाशीला बोंडे लागून ती फुटण्याच्या अवस्थेत आहेत. जिरायतीला कापसाची वाढही चांगली होत आहे.
परतीच्या पावसाने जिरायतीला बोंडे येतील, पितृपक्षात ती फुटतील. विजयादशमीपर्यंत खरिपातील जिरायती कापूस बाजारात येईल, असा अंदाज आहे. यंदा कापसाला प्रतिक्विंटल सात ते आठ हजारांचा दर असेल, असा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत.
"परतीच्या पावसाने कापूस उत्पादन चांगले येणार आहे. बाजारात थोडा उशिराने कापूस येईल. यंदा कपाशीवर बोंड अळी नाही. यामुळे कापसाचा दर्जा चांगला राहील. गत महिन्यापर्यंत पावसाअभावी कापसाच्या उत्पादनाविषयी शंका होती. मात्र, परतीच्या पावसाने आशादायक चित्र आहे." - प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जीनिंग प्रेसिंग असोसिएशन