शेतकऱ्यांना बांधावरच मिळताहेत खते, बियाणे 

farmer
farmer

भडगाव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तसेच लॉकडाउनमुळे दुकानांवर शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून खरीप हंगामात शेतकऱ्यांना फार्मा प्रोड्युसर कंपनीतर्फे कृषी विभागाच्या माध्यमातून बांधावरच खते व बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी विभागाच्या या आवाहनाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ४७ मेट्रिक टन खते, १ हजार २५४ कापूस बियाणांचे पॅकेट्स बांधापर्यंत पोचविण्यात कृषी विभागाला यश आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च वाचण्यास मदत झाली आहे. 
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्याने कृषी केंद्रांवर बियाणे व खते घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये, यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावरच खते उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी विभागाच्या या निर्णयाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

२ हजार मेट्रिक टन खत बांधावर 
शेतकऱ्यांच्या बांधावर खत योजनेनुसार, जिल्ह्यात ७ ते २७ मे पर्यंत एकूण २ हजार ४७ मेट्रिक खते बांधापर्यंत पोहचली आहेत. ही खते १५ तालुक्यातील २६८ शेतकरी गट, फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून पोचविण्यात कृषी विभागाला यश आले आहे. यामुळे १ हजार ३७ शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. अजूनही गटाच्या माध्यमातून बांधापर्यंत खत पोचविण्याचे काम सुरू आहे. यात पाचोरा उपविभागातून सार्वधिक खते उचलण्यात आली आहेत. ९६८ मेट्रिक खते बांधांपर्यंत पोहचली आहेत. त्या खालोखाल जळगाव उपविभागात ७६६ मेट्रिक टन, अमळनेर विभागातून ३१२ मेट्रिक टन खतांची शेतकऱ्यांच्या गटांनी उचल केली आहे. 

कापसाचे बियाणेही बांधापर्यंत 
खतांसोबतच कापूस बियाणाचे पाकीटही शेतांच्या बांधापर्यंत पोचविण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १ हजार २४५ कापसाच्या पाकिटांची शेतकऱ्यांच्या गटांनी खरेदी केली आहे. ज्यात जळगाव (१००), यावल (१२०), भडगाव (७००), जामनेर (३२५) पाकिटे वितरित झाली आहेत. तर ३५ क्विंटल विविध बियाणे देखील शेतकऱ्यांच्या गटांनी एकत्रित खरेदी करून त्यांचे शेतकऱ्यांना वाटप केले आहे. 
 
शेतकऱ्यांचे वाचले दोन पैसे 
शेतकऱ्यांना खरीप हंगामात बांधावर खते व बियाणे उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या पैशांची चांगल्या प्रकारे बचत झाली असल्याचे चित्र आहे. गटांमार्फत किंवा फार्मा प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या वाहतूक खर्चाची मोठ्या प्रमाणावर बचत झाली आहे. शेतकरी एकत्रित येऊन गट म्हणून ऑर्डर दिल्यानंतर जास्तीचा माल खरेदी करतात. ज्यामुळे काही प्रमाणात भावात सूट देखील मिळते. शेतकऱ्यांच्या काही गटांनी थेट बियाणे कंपनी, मुख्य डिलरकडून खरेदी केल्याने त्यांना बाजारभावापेक्षा कमी किमतीने बियाणे उपलब्ध होत आहे. शिवणी (ता. भडगाव) येथील पदमालया फार्मा प्रोड्यूसर कंपनीने सोयाबीनचे बियाणे थेट कंपनीकडून खरेदी केल्याने त्यांना एका थैलीमागे ३०० रुपयांपर्यंत फायदा होत असल्याचे तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरडे यांनी सांगितले. 
 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com