कुणी वीज देता का वीज?..आदिवासी बांधवांची आर्त हाक !   

कुणी वीज देता का वीज?..आदिवासी बांधवांची आर्त हाक !   

चोपडा : तालुक्यातील उत्तर भागातील सातपुडा पर्वतरांगांमधील आदिवासी पाड्यात तब्बल पाच महिन्यांपासून २४ तासांपैकी १६ ते १८ तास वीज गुल होत असून, फक्त आठ तास वीज मिळत असल्याने रात्री तरी १२ तास वीज द्या, अशी आर्त हाक आठ ते दहा खेड्यांमधील आदिवासी बांधवांनी दिली आहे. 


तालुक्यातील उमर्टी, अमलवाडी व गौऱ्यापाडा, मोरचिडा, सत्रासेन, उत्तमनगर परिक्षेत्रातील गावांना शेतीपंपासाठी लागू असलेला वीजपुरवठा देण्यात येत असल्याने या सहा ते आठ गावांना पाच महिन्यांपासून फक्त आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. ही गावे वन विभागाच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने त्यांना गावठाणानुसार वीज न देता शेतीपंपाप्रमाणे वीज दिली जात आहे. यामुळे रात्री बाराला वीज येते, तर सकाळी आठला वीजपुरवठा खंडित होतो. ऐन पावसाळ्यात संपूर्ण रात्रभर वीज मिळत नाही. 


रात्री वीज नसल्याने या गावातील लोक हैराण झाले आहेत. या लोकांना रात्री अंधारात राहावे लागत आहे. जंगलाचा भाग असल्याने रात्री विंचू, साप असे विषारी प्राणी फिरत असल्याने अंधारात रात्री घराबाहेर जाण्यास लोक घाबरत आहेत. सायंकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत तरी वीज द्यावी, अशी मागणी आदिवासी बांधव करीत आहेत. 

आमदारांनी पालकमंत्र्यांना केला पत्रव्यवहार 
या गावांतील काही नागरिकांनी मे महिन्यात आमदार लता सोनवणे यांची भेट घेतली होती. त्यानुसार २५ मेस आमदार लता सोनवणे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना उमर्टी फीडर योजनेंतर्गत सिंगल फेज करण्यासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करावा, असे पत्र दिले होते. त्यावर पालकमंत्र्यांनी कार्यकारी अभियंता व प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविले होते. परंतु अजूनपर्यंत अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येते. नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, मागणी मान्य झाली नाही तर १७ जुलैपासून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा अमोल राजपूत, राजू पावरा यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. 


स्वातंत्र्याची ७३ वर्षे उलटूनही उपेक्षा 
स्वातंत्र्याची ७३ वर्षे उलटून गेली तरी चोपडा तालुक्यातील आदिवासींना मूलभूत सुविधाही पूर्णतः मिळत नसल्याने अडचणी येत आहेत. आदिवासी विकासाच्या गप्पा मारणारे शासनकर्ते अजूनही आदिवासी बांधवांच्या उंबरठ्यापर्यंत विकासाच्या योजना पोचवू शकले नाही. बहुतांश आदिवासी जनता ही डोंगराळ भागातील कड्याकपारीत राहत आहे. 

ही गावे वन विभागात येत असल्याने शेती व गावठाणचे एकच फीडर आहे. हे स्वतंत्र करण्यासाठी प्रस्ताव मंजूर झाला आहे. वन विभागाची अडचण असल्याने फीडर सेपरेशन नाही. २५ टक्क्यांपेक्षा जास्त लोड कृषीचा आहे. आदिवासी विकास योजनेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला असून, तो मंजूर झाल्यानंतर गावठाण फीडर टाकून व्यवस्थित सिंगल फेज वीजपुरवठा करता येईल व अडचण दूर होईल. 
-रमेश पवार, कार्यकारी अभियंता, वीज वितरण, धरणगाव 

सत्रासेन ते उमर्टीला लागून असलेल्या आदिवासी गावांना फक्त आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. रात्रीही वीज नसते. आम्हाला अंधारात राहावे लागते. किमान रात्री तरी वीज सुरू ठेवावी. 
-प्रेमसिंग पांडू बारेला, ज्येष्ठ नागरिक, उमर्टी 

आमचे म्हणणे एवढेच की सहा आदिवासी गावे असून, वीज वितरण कंपनी चुकीच्या वेळी वीज देत आहे, जी आमच्या काहीही कामाची नाही. लोकप्रतिनिधींसह अधिकारीही आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे आम्हाला आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागेल. 
-अमोल प्रतापसिंह राजपूत, उमर्टी 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com