९४ शेतकरी म्‍हणतात...ओल्या मातीच्या कुशीत अंकुर फुटलेच नाही 

ankur
ankur

चोपडा : यंदा पाऊस वेळेवर आल्याने पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या...कोंब फुटून पिकंही तरारू लागली. परंतु जिल्ह्यातील ९४ शेतकऱ्यांच्या काळ्या मातीच्या कुशीत अंकुर फुटलेच नाही. शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे न उगविल्याने ९४ तक्रारी दाखल झाल्या. तक्रारदार शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्याचे शासनाचे आदेश आहेत. पण नुसते बियाणे बदलवून दिल्याने प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल शेतकरी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे. 

राज्यात यावर्षी कधी नव्हे एवढ्या बियाणे उगवणी संबंधित तक्रारी आल्या आहेत. त्यात विशेषतः सोयाबिन पिकाच्या तक्रारी होत्या. त्यात महाबीजसह, खासगी कंपन्या, बिजोत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या यांचे बियाणे होते. वास्तविक पाऊस दरवर्षीपेक्षा यावर्षी मृग नक्षत्रातच चांगला झाला. तसेच ज्या भागातून सोयाबिन उगवणीच्या तक्रारी आल्या, त्या भागातील शेतकरी अगोदरपासूनच सोयाबीन पेरणी करीत आहेत. सोयाबिनची उगवणशक्ती कमीची कारणे काहीही असोत, मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यात मशागत, पेरणी, खते, मजुरी हा सर्व खटाटोप शेतकऱ्यांना पुन्हा करावा लागणार आहे. वास्तविक ज्या शेतकऱ्यांनी मशागत करून सोयाबीनची पेरणी करून उगवण झाली नसेल किंवा उगवण झाली पण कोंब वर येऊन पिवळे पडले असतील या ना त्या अनेक गोष्टी आहेत. यासाठी कृषी विभागाने स्वतः फिल्डवर जाऊन शेताची पाहणी करून पंचनामे करण्याची गरज होती. ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत, त्यांच्यापैकी काही शेतकऱ्यांना लागलीच बियाण्यांची पाकिटे देण्यात आली. एवढा प्रकार पुरेसा आहे का? आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या या शेतकऱ्यांना आधार कोण देणार? मशागत, पेरणी, खते, मजुरी याचा खर्च कोण देणार? या बाबी पाहण्याची गरज आहे. 

बियाणे बदलूनही मिळेल, हंगामाचे काय? 
तक्रारींची दखल घेत शासन बिजोत्पादक कंपन्यांवर गुन्हा दाखल करू, असे सांगत आहे. शेतकऱ्यांना खरोखरच नुकसान भरपाई मिळेल का? शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर संबंधित समिती पंचनामा करेल व त्यात जे नुकसान झाले, ते मिळविण्यासाठी ग्राहक मंचात जावे लागेल. समितीच्या पंचनाम्यानुसार बियाण्यांचे नुकसान झालेले दिसते. पेरणी हंगाम बाकी असल्याने ते नुकसान धरले जाणार नाही. पंचनामानुसार कंपनी नुकसान भरपाई दिली तर ठिक नाहीतर शेतकऱ्यांना ग्राहक मंचात जावे लागेल. किरकोळ नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना ग्राहक मंचात जायला परवडणार नाही. त्यामुळे आता शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. 

तालुकानिहाय तक्रारींची संख्या 
जळगाव....२२ 
रावेर........०३ 
मुक्ताईनगर..०६ 
पाचोरा......०६ 
भडगाव.....११ 
जामनेर......०८ 
चाळीसगाव..०१ 
अमळनेर....०१ 
पारोळा.....०१ 
धरणगाव....२४ 
एरंडोल.....०७ 
चोपडा.....०४ 
एकूण......९४ 

संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com