मुख्यमंत्र्यानी जनतेचे हित पाहून मेट्रो कारशेड हलविण्याचा निर्णय घेतला -मंत्री पाटील

मुख्यमंत्र्यानी जनतेचे हित पाहून मेट्रो कारशेड हलविण्याचा निर्णय घेतला -मंत्री पाटील

जळगाव ः मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीप्झ)चे कारशेड आरेतील 33 हेक्टर जागेवर बांधण्याचे प्रस्तावित होते. परंतु, या कारशेडमुळे आरे जंगल नष्ट होणार होते. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेतून मेट्रो कारशेड कांजूरला हलविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी जनतेचे हित पाहिले आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

मंत्री पाटील जळगावात असताना अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. आरे प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचा यावेळी मंत्री पाटील यांनी समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, तसे आमचेही म्हणणे होते की बुलेट ट्रेन हा विषयच चुकीचा आहे. मुंबई ते दिल्ली किंवा मुंबई ते नागपूर अशी बुलेट ट्रेन झाली असती तर विषय वेगळा होता. पण बुलेट ट्रेन अहमदाबाद का झाली, असा आमचा विषय होता. आता मुंबईतील कारशेडच्या बाबतीत ते काही म्हणत असतील तर तो त्यांचा विषय आहे. आरेच्या बाबतीत म्हणायचे झाले तर लोकांसाठी काही गोष्टी जोपासल्या गेल्या पाहिजेत. पैशांच्या किंमतीपेक्षा तेथील नैसर्गिक जे वातावरण आहे, ते टिकवणे महत्त्वाचे आहे. आरेतील जागा सोडली तर आज मुंबईतील लोकांसाठी अशी कोणतीही जागा उपलब्ध नाही. आरे प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेचे हित पाहिले आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

शेतकरी रस्त्यावर येईल, अशा विषयांना आमचा विरोधच- 
दरम्यान, केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विषयावरही त्यांनी मत मांडले. ते म्हणाले, नवीन कृषी कायद्यात काही मुद्दे चांगले आहेत तर काही मुद्दे चुकीचे आहेत. या विषयावर अभ्यास करण्यासाठी राज्य सरकार एक समिती नेमणार आहे. जे मुद्दे चांगले आहेत, त्यांचे स्वागत आहे. पण ज्यामुळे शेतकरी रस्त्यावर येतील, शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशा विषयांना आमचा कायम विरोध असेल, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

हे काय महिलांच्या सन्मानाविषयी बोलतील? 
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या मुद्द्यावर आज भाजपाकडून राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येत आहे. भाजपाच्या आंदोलनावर देखील गुलाबराव पाटील यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, केंद्रात कॅबिनेट मंत्री असलेल्या पंजाबच्या नवनीत कौर यांना पंतप्रधान कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यांनी एका शिपायाकडे आपला राजीनामा दिला. त्यांचा सन्मान झाला नाही. भाजपाच्या महिला आघाडीने त्यांच्यासाठी आंदोलन केले पाहिजे होते. हा विषय लक्षात घेतला तरी भाजपाच्या महिला आघाडीचे आंदोलन सार्थकी लागेल. भाजपाला स्वतःला महिलांचा सन्मान करता येत नाही, हे काय महिलांच्या सन्मानाविषयी बोलतील? असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com