जळगाव ः जिल्ह्यातील ग्रामीण भागात विजेचा (Power) खेळखंडोबा सुरू आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या पाणी पुरवठा योजना, पथदिव्यांचा विज पुरवठा खंडीत केला जातो, शेतकऱ्यांना (Farmer) विज दिली जात नाही, अवाच्या सव्वा बिले आकारणी करून, ८० टक्के विज बिले भरण्याची सक्ती केली जात आहे. विज कंपनीचे अधिक्षक अभियंता फारूख शेख यांच्या मनमानीला सर्व लोकप्रतिनिधी कंटाळले आहे, शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या शेख यांच्या कारभारावर अतिशय संताप जनक भावना आहेत, यामुळे त्यांची विभागीय चौकशी करावी, त्याला निलंबीत करावे असा ठराव आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीत (District Planning Committee) सदस्यांनी केला. याविषयावर काही वेळा गोंधळही झाला.
अधिकारी शेख यांच्यावर कारवाईचे अधिकार मंत्रीमंडळाला आहे. शेख यांच्या कारभाराविषयी येत्या बुधवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत हा विषय मांडतो. असे आश्वासन पालकमंत्री, समितीचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी आज सभागृहाला दिले. जिल्हा नियोजन समितीची सभा आज नियोजन सभागृहात झाली. त्यात शेख यांच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करण्यात आला. खासदार रक्षा खडसे, माजीमंत्री गिरीष महाजन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राउत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशीया, पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, आयुक्त सतीष कुलकर्णी यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते.
आमदार पाटीलांनी तक्रारीचा पाढाच वाचला
आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा मतदार संघातील विज कंपनीचे शेख यांच्या कारभाराचा पाढाच वाचला. जिल्ह्यात विजेच्या डिपी मंजूर होत नाही, मंजूर झाल्या तर त्यात आईल नसते, जळगावला गोडावून असताना त्यात ऑईलचा मोठा साठा आहे. परजिल्ह्यात ऑईलचे बॅरल शेख पाठवितात मात्र जिल्ह्यात ऑईल उपलब्ध करून दिले जात नाही. बिलांची सरसकट आकारणी केली जाते. ८० टक्के शेतकऱ्यांनी बिले भरल्याशिवाय विज कनेक्शन दिले जात नाही. शहरांतील पथदिवे, पाणी पुरवठा योजनांचा विज पुरवठा अचानक खंडीत केला जातो. शेतकऱ्यांना वेळेवर विज मिळत नाही. शेख हेतू पुरस्कार शेतकरी व लोकप्रतिनिधींना नाडतात. अशीच भुमिका जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, माजीमंत्री गिरीष महाजन, खासदार खडसे आदींनी मांडल्या.
शासनाकडून सप्टेंबर पुर्वीची बिले भरण्याची सक्ती नसताना शेख शेतकऱ्यांना बिले भरण्याची सक्ती करतात, विज जोडणी देत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होताहेत. पन्नास टक्के शेतकऱ्यांनी बिले भरली तरी विज जोडणी करावी अशी मागणी सदस्यांनी केली. सदस्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात, यामुळे शेख यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.
पालकमंत्री पाटील यांनी शेख यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले असता, आम्ही पन्नास टक्के शेतकऱ्यांनी बिले भरली तर विज जोडणी देतो, असे सांगताच, हे खोटे उत्तर असल्याची सदस्यांनी ओरड केली.
एक बिल भरले तरी विज जोडणी
पालकमंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांनी तीन पैकी एक जरी बिल भरले तरी विज जोडणी द्यावे असे आदेश दिले. अभियंता शेख यांच्या कार्यपध्दती बाबत कॅबिनेट बैठकीत सांगतो. ते चौकशी व कारवाईचा निर्णय घेतील असे सांगीतले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.