‘टायगर अभी जिंदा है..’तून व्यक्तिगत संघर्षाचे संकेत 

eknath khadse
eknath khadse

जळगाव  माजी मंत्री एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीतील बहुचर्चित व बहुप्रतीक्षित प्रवेश सोहळ्याचा अंक आज अखेर पार पडला.. खडसेंवरील अन्यायाबाबत जयंत पाटलांनी ‘कटप्पाने बाहुबली को क्यूं मारा’ हा प्रश्‍न पुन्हा उपस्थित करत ‘टायगर अभी जिंदा है’ हे लवकरच दिसून येईल, असे वक्तव्य केले.. तर खडसेंनीही पक्षबदलाबाबत काहीजण ‘ते ईडी लावतील’ असे सांगणारे भेटले पण.. ‘त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल’ असा गर्भित इशारा देत संघर्षाचे संकेत दिले. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात पक्षीय संघर्षापेक्षा व्यक्तिगत संघर्षातून होणारा सामना अधिक रंगेल, हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज नाही. 


खडसेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभेत झालेल्या भाषणा दरम्यान जयंत पाटील यांनी प्रथमच ‘कटप्पाने बाहुबली को क्यूं मारा?’ असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर तेव्हा सभागृहात हंशा पिकला... पण, जयंत पाटलांच्या या प्रश्‍नाचे उत्तर त्यांना आजपर्यंत मिळाले नाही, हे त्यांनी स्वत: आज खडसेंच्या प्रवेशसोहळ्यात पुन्हा सांगितले. प्रदेशाध्यक्ष या नात्याने खडसेंच्या गळ्यात राष्ट्रवादीचा गमछा घातल्यानंतर त्यांनी भाजपत खडसेंवर झालेल्या अन्यायाबद्दल टीका करणे अपेक्षितच होते. कटप्पा आणि बाहुबलीतील प्रसंगाचा दाखल देत त्यांनी ‘टायगर अभी जिंदा है, पिक्चर अभी बाकी है’ असे सांगत खडसेंच्या वतीने भाजपलाही इशारा देऊन टाकला. 

म्‍हणून संघर्षयात्री ओळख
खडसेंच्या ४० वर्षे राजकीय प्रवासातील ३० पेक्षा अधिक वर्षे विरोधी पक्षात गेली. भाजपतही ते गेल्या चार वर्षांपासून सातत्याने होणाऱ्या अन्यायाबाबत विरोधक म्हणूनच भूमिक बजावत होते. त्यांच्या या विरोधातील राजकीय यात्रेनेच त्यांना खऱ्या अर्थाने संघर्षयात्री म्हणून ओळख मिळवून दिली. व्यक्तिगत जीवनातही त्यांनी मोठा संघर्ष केलांय.. आता वयाच्या उत्तरार्धात राष्ट्रवादीत प्रवेश करुन ‘नवी इनिंग’ सुरु करतानाही त्यांनी संघर्षाचाच पवित्रा घेतलांय.. 

आता खुल्‍या मैदानात
राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर केलेल्या भाषणातून खडसेंनी त्यांना झालेल्या त्रासाबद्दल एल्गार पुकारला. विनयभंगाचा खोटा गुन्हा, भूखंड जमीन खरेदी प्रकरणाचा उल्लेख करत खडसेंनी कुणी, किती भूखंड घेतले हे जाहीर करुन चौकशीची मागणी करण्याचे संकेत त्यांनी दिले. एवढ्यावरच खडसे थांबले नाहीत.. ‘काहीजण म्हणताय ते ईडी लावतील.. पण त्यांनी ईडी लावली तर आपण सीडी लावू’ असा गर्भित इशारा देत त्यांनी भाजपतील काही नेत्यांविरोधात उघड एल्गार पुकारलांय.. त्यामुळे आतापर्यंत पक्षात राहून विशिष्ट मर्यादेत असलेला हा संघर्ष आता खुल्या मैदानात, उघड होणार आहे. 
प्रवेश सोहळ्यात सर्वच नेत्यांनी केलेल्या भाषणातून भाजपविरोधी सूर दिसून आला नाही.. तर खडसे, त्यांच्यावरील अन्याय, त्यांचा संघर्ष.. हेच मुद्दे केंद्रित होते. स्वाभाविकत: भविष्यातील संघर्ष राष्ट्रवादी विरुद्ध भाजप यापेक्षा खडसे विरुद्ध फडणवीस असाच रंगणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com