इव्हेंट ‘मॅनेजमेंट’चे वर्षभराचे नियोजन कोलमडले  ​

इव्हेंट ‘मॅनेजमेंट’चे वर्षभराचे नियोजन कोलमडले   ​

जळगाव: लग्नसोहळ्यांसह लहान-मोठ्या समारंभांचे ‘मॅनेजमेंट’ करणाऱ्या इव्हेंट संस्थांचे गेल्या वर्षभरापासूनचे नियोजन कोरोनामुळे पूर्णपणे कोलमडले आहे. इव्हेंट मॅनेजमेंटच्या व्यावसायिक संस्थांकडे नोंदणी झालेले वर्षभरातील जवळपास ९० टक्के कार्यक्रम रद्द झाल्याने या संस्थांचे संचालक व त्यावर अवलंबून घटकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. 


कोणत्याही स्वरूपाचा कार्यक्रम भव्य स्वरूपात करायचा झाला की त्याला नियोजनाची आवश्‍यकता असते. लग्नसोहळे, रिंग सेरेमनी, वाढदिवस पार्टी, मौंजीबंधन एवढेच नव्हे तर होळी, राज्य नाट्य स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, शासकीय अथवा राजकीय पक्षांचे, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांचे असे अनेक कार्यक्रम आता नियोजनबद्ध करायचे म्हणून ते इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीकडे सोपविण्याचा ट्रेंड वाढला आहे. गेल्या काही वर्षांत अशा अनेक संस्था होतकरू युवकांनी पुढे येऊन सुरू केल्या आणि त्यातून रोजगार मिळविला. काही जण तर व्यक्तिगतपणेही असे सोहळे मॅनेज करून देतात. 
‘अक्षता ते बिदाई अन्‌ बॅन्ड ते शहनाई...’ असे ब्रीद घेऊन लग्नसोहळ्यांचे इव्हेंट आयोजित करून घेतले जातात. 


निर्बंधांमुळे मर्यादा 
दर वर्षी लग्नाच्या सीझनमध्ये अशा संस्था अथवा व्यक्तींकडे बऱ्यापैकी सोहळ्यांची नोंदणी झालेली असते. मात्र, मार्च २०२१ पासून सार्वजनिक, सांस्कृतिक अशा सर्वच कार्यक्रमांवर कोरोनामुळे निर्बंध आले आणि ही रोजगार मिळवून देणारी मोठी इंडस्ट्री प्रभावित झाली. मंगल कार्यालये, सभागृह, टेंट, केटरर्स अशा सर्वच घटकांचा यात समावेश होता. मात्र, सोबतच डेकोरेशन, साउंड व अन्य लहान-मोठ्या सर्व गरजा भागविणारी इव्हेंट मॅनेजमेंट संस्थाही अडचणीत आहेत. 

शंभर जणांची टीम 
कोणत्याही लहान-मोठ्या लग्न वा अन्य सोहळ्यांत विविध स्वरूपाचे काम करणारी किमान १०० जणांची टीम कार्यरत असते. त्यात हॉल, टेंट, बॅन्ड, शहनाई, केटरर्स, वेटर, डेकोरेटर, डीजे, फोटोग्राफर, भटजी, घोडेवाला, फुलवाले अशी ही मोठी यादी आहे. या सर्वच घटकांना कोरोना व लॉकडाउनच्या मर्यादांचा फटका बसला आहे. 

सर्वच कार्यक्रमही रद्द 
या सोहळ्यांसोबतच शासनाने कोणत्याही प्रकारच्या सभा, उत्सव, सार्वजनिक, जाहीर, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांवरही बंदी घातली आहे. त्यामुळे काही संस्था अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या नियोजनात सहभागी असल्याने त्याचाही फटका अशा एजन्सीला बसला आहे. 

वर्षभरापासून भव्य सोहळे बंद आहेत. २० जणांच्या मर्यादेत लग्न वा अन्य समारंभ घ्यायचे झाल्यास त्याला इव्हेंट मॅनेजमेंटची आवश्‍यकता नसते. त्यामुळे आमच्यासह त्यावर अवलंबून घटकांसमोर वर्षभरापासून उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
-सरिता खाचणे 


आपल्याकडील लोक उत्सवप्रिय आहेत. त्यामुळे गरिबाकडील लग्नातही किमान दोन-चार लाखांचा खर्च होतो. त्यामुळे अशा सोहळ्यांचे नियोजन करून त्यावर काही जणांचा रोजगार चालतो. आता वर्षभरात बऱ्याच मर्यादा आल्याने या इंडस्ट्रीला फटका बसला असून, अनेकांनी अन्य व्यवसाय सुरू केले आहेत. 
-दिनेश थोरात 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com