रस्ते सिल केले खरे...पण झाले उलटेच; गर्दी, वाहतुकीची कोंडीमूळे नागरीक हैराण !  

रस्ते सिल केले खरे...पण झाले उलटेच; गर्दी, वाहतुकीची कोंडीमूळे नागरीक हैराण !  

जळगाव  : लोकल लॉकडाउन संपल्यानंतर जिल्हा व महापालिका प्रशासनाने जळगाव शहरातील बाजारपेठ व प्रमुख रस्ते सील करण्याचा घेतलेला निर्णय मूर्खपणाचा असून, त्यातून गर्दी नियंत्रणात येणे तर दूरच उलटपक्षी, उपरस्ते व छोट्या गल्ल्यांमध्ये वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र तीन दिवसांपासून दिसतेय.

प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल आता सर्व स्तरांतून टीका होत आहे. 
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी ७ ते १३ जुलैदरम्यान जळगाव शहरासह अमळनेर, भुसावळ येथे कडक लॉकडाउन जाहीर केला. प्रशासनाने त्यासाठी केलेल्या प्रयत्नांना जळगावकरांनी तेवढ्याच प्रामाणिकपणे सहकार्य केले. 


कडक लॉकडाउननंतर मंगळवार (ता. १४)पासून पुन्हा शहरातील व्यवहार अनलॉक दोनच्या धोरणानुसार पूर्ववत होतील, अशी अपेक्षा होती. तसे झालेही असते. मात्र, फुले मार्केट, गांधी मार्केट, सुभाष चौक, सराफ बाजार, पोलन पेठ, बोहरा बाजार आदी भागात येणारे सर्व रस्ते सील केले. या रस्त्यांवर गर्दी होऊ नये, हा त्यामागचा उद्देश होता. मात्र, प्रशासनाचा हा निर्णय आता आत्मघातकी ठरू लागला आहे. 

उपरस्त्यांवर गर्दी 
कोर्ट चौक ते चित्रा चौकापर्यंत डाव्या बाजूचे सर्व रस्ते, पुढे चित्रा चौक ते पुष्पलता बेंडाळे चौकापर्यंत डाव्या बाजूने सील झाले. चित्रा चौकातून पुढे पोलन पेठ, राजकमल चौकाकडे जाता येत नाही. दाणाबाजारही सील केलाय. टॉवर चौकापासून पुढे जायला बंदी, तोही रस्ता सील. त्यामुळे या सर्व प्रमुख रस्त्यांना लागून असलेल्या उपरस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे. तुलनेने अरुंद असल्याने रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत असून, मिळेल त्या ठिकाणी वाहन लावून नागरिक खरेदी व अन्य कामासाठी बाजारपेठेत जात आहेत. त्यामुळे गर्दी नियंत्रणाच्या उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. 
 
नागरिकांच्या संतप्त भावना 
प्रशासनाच्या उपाययोजनेचा सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. गोलाणी मार्केटपासून थेट चौबे मार्केटपर्यंत, टॉवरपासून बेंडाळे चौकापर्यंत अशा संपूर्ण परिसराला प्रदक्षिणा घालावी लागतेय. याबद्दल नागरिक तीव्र संताप व्यक्त करत असून, हा मूर्खपणाचा निर्णय असल्याची टीकाही होतेय. 

पत्र्या हनुमान मंदिराकडून रस्ता खुला केला 
ममुराबादकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी महापालिकेने गुरुवारी पत्र्या हनुमान मंदिराकडून रस्ता वनवे केला आहे, तर ममुराबादकडून येणारी वाहतूक मनोहर साडीजवळून, शहर पोलिस ठाण्यासमोरून सुरू केली आहे. वाहनधारकांनी त्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. 


 संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com