जळगाव शहरात अमृत’ चे काम झालेल्या भागात होणार रस्ते

जळगाव शहरात अमृत’ चे काम झालेल्या भागात होणार रस्ते

जळगाव: नोव्हेंबर २०१७ मध्ये सुरू झालेले अमृत योजनेचे काम मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होऊ शकले नाही. सोबतच मलनिस्सारण योजनेचे कामही सुरू झाले. नियोजनाअभावी ही कामे रखडली व रस्तेही खराब झाले. त्यामुळे आता ज्या भागात ‘अमृत’ची कामे पूर्ण होतील, त्याठिकाणी रस्त्यांची कामे हाती घेण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या. 

शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेता मंगळवारी महापौरांनी आपल्या दालनात अधिकाऱ्यांकडून याबाबत आढावा घेतला. भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती ॲड. शुचिता हाडा, महिला व बालकल्याण सभापती शोभा बारी, नगरसेवक कैलास सोनवणे, गटनेते भगत बालाणी, सभागृहनेते ललित कोल्हे, नगरसेवक विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते. 

सध्या शहरातील अनेक भागात अमृत योजनेचे काम अपूर्ण असल्याने मक्तेदाराला मार्च २०२१ पर्यंतची मुदत दिली असून, त्याबाबतचा सुधारित ‘बार चार्ट’ही त्याने महापालिकेला दिला आहे. अमृतच्या कामाची संपूर्ण देखरेख मनपाकडे नव्हती, तर त्यात तांत्रिक सल्ला, मार्गदर्शन आणि शिफारसकामी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा सहभाग होता. बऱ्याच वेळा समन्वय राखला जात नसल्याने कामाला विलंब होत होता. सध्या अंशतः लॉकडाउन काळात शनिवारी आणि रविवारी काम करण्याची परवानगी मक्तेदारास दिली आहे. 

रस्त्यांची लवकरच डागडुजी 
‘अमृत’च्या कामाला गती आली असून, मार्च २०२१ पर्यंत काम पूर्ण होईल. पाऊस कमी झाल्यानंतर अमृतचे खड्डे आणि चाऱ्या बुजविण्याबाबत मक्तेदाराला सूचना दिल्या आहेत. 

डांबरी रस्त्यांसाठी ४१ कोटी 
शहरातील अमृत योजना आणि मलनिस्सारण योजनेची कामे पूर्ण केल्यानंतर हाती घेण्यासाठी ४१ कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत. बुधवारी (ता. २३) होणाऱ्या महासभेसमोर याबाबत वाढीव कामांचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. 
 

असा आहे शासन आदेश 
शासनाने ११ मे २०१७ ला काढलेल्या आदेशानुसार राज्यात नगरोत्थान अभियान, अमृत योजना, मलनिस्सारण योजनेची अनेक शहरात कामे सुरू आहेत. शासनाच्या असे निदर्शनास आले, की अगोदर रस्ते बांधले जातात आणि योजनेच्या कामामुळे ते पुन्हा खोदण्यात येतात. त्यानंतर रस्ते बांधकामासाठी शासनाकडे निधीची मागणी होते. हा अपव्यय टाळण्यासाठी शासनाने निर्देश दिले असून, अमृत योजना, पाणीयोजना, मलनिस्सारण योजनेचे काम पूर्ण झाल्याशिवाय रस्त्यांची कामे करू नयेत, असे शासनाने स्पष्ट केले आहे. 

या दिल्या सूचना 
-सुटीच्या दिवशीही कामे सुरू ठेवा 
-मनपा अभियंत्यांनी कामांवर लक्ष ठेवावे 
-अमृतचे काम झालेल्या भागात रस्ते बनवा 
-पाऊस कमी झाल्यावर खड्डे, चाऱ्या बुजवा 

अमृतच्या कामाचे ‘स्टेटस्‌’ असे 
-एचडीपी पाईपलाईन : ५८६ पैकी ४३० किमी (७५ टक्के) 
-डीआय मोठी पाईपलाईन : १७ पैकी ११ किमी (६५ टक्के) 
-डीआय डिस्ट्रिब्युटर पाईपलाईन : ५८ पैकी ३७ किमी (७० टक्के) 
-पाईपलाईन तपासणी : ५८६ पैकी २९५ किमी (५२ टक्के) 
-भूमिगत टाक्या, पंप हाऊस : ९० टक्के 
-उंच पाणी टाक्या : ५० टक्के 
-नळजोडणी देणे : ३० टक्के 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com