जळगाव ः कोरोना संसर्गामुळे राज्यात एसटीच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ होत नाही. आंतरराज्य वाहतुकीस परवानगी नाही. बसफेऱ्या होत नसल्याने कर्मचारी घरी बसून आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी जळगाव जिल्ह्यातील सहा हजार कर्मचाऱ्यांना २०-२० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा फतवा काढला आहे. रजेवर पाठविता म्हणजे महामंडळाचे नेमके काय नियोजन आहे, असे एक ना अनेक शंका यानिमित्त उपस्थित होत आहेत.
जळगाव जिल्ह्यात परिवहन महामंडळात सुमारे सात ते साडेसात हजार कर्मचारी आहेत. यात शिपायापासून लिपिक, वाहनचालक, वाहक, यांत्रिकी विभागात कामगारांपासून विभाग नियंत्रकापर्यंतचा समावेश होतो. त्यातील सहा हजार कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणार आहेत.
सध्या अल्प बस सुरू आहेत. सुरू असलेल्या बसना फारसा प्रतिसाद नाही. त्यामुळे तोटा वाढत आहे. कर्मचाऱ्यांना पगार आज ना उद्या द्यावाच लागणार आहे. यावर पर्याय म्हणून मलवाहतूक सुरू केली. त्याला प्रतिसाद बरा आहे. असे असताना जिल्ह्यातील एसटीचालक, वाहक, यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांना २०-२० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश दिला आहे.
चौकट
...अशा आहेत सूचना
- सर्व आगारप्रमुखांनी मोजकेच कर्मचारी बोलवावेत.
- चालक, वाहक, सहाय्यक, इशाराकार, वाहतूक कर्मचाऱ्यांना अर्जित रजा द्यावी.
- ५० किंवा जादा वय वर्ष असणाऱ्या कर्मचाऱ्यांना २० दिवसांची अर्जित रजा देण्यात यावी.
- प्रतिबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना २० दिवसांची रजा द्यावी.
- लिपिक, टंकलेखकांना रोटेशन पद्धतीने अर्जित, वैद्यकीय रजा दहा-दहा दिवस द्यावी.
अगोदर ८ जुलै ते १७ जुलै, नंतर १८ ते २७ जुलैपर्यंत रजा द्यावी.
संपादन- भूषण श्रीखंडे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.