PM Kisan Yojana : पीएम किसान हप्त्यापासून 96 हजारपेक्षा जास्त शेतकरी राहणार वंचित? | More than 96 thousand farmers will be deprived of PM Kisan installment jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Kisan Yojana latest marathi news

PM Kisan Yojana : पीएम किसान हप्त्यापासून 96 हजारपेक्षा जास्त शेतकरी राहणार वंचित?

Jalgaon News : पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अद्यापही जिल्ह्यातील ३३ हजार २३ शेतकऱ्यांचे बॅंक खाते आधार सिंडीग झालेले नाही. तसेच, ६३ हजार १४४ शेतकरी लाभार्थ्यांचे इ-केवायसी लिंकींग झालेले नाही. त्यामुळे सुमारे ९६ हजारांपेक्षा अधिक शेतकरी ‘पीएम किसान’ योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. (More than 96 thousand farmers will be deprived of PM Kisan installment jalgaon news)

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यासह जिल्ह्यात शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्यासाठी पीएम किसान योजनेसाठी प्रतिवर्ष सहा हजार रूपये प्रमाणे शेतकऱ्यांना समान तीन हप्त्यांत लाभ दिला जात आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत १३ हप्त्यांचा लाभ देण्यात आला आहे. १४ व्या हप्त्याचा लाभ मे अखेरीपर्यंत वा त्यापूर्वी देण्यात येणार आहे.

या लाभासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसीसह बॅंक खात्याशी आधारकार्ड लिंकीग करण्यासाठी आतापर्यंत वेळोवेळी मुदत देण्यात आली होती. तथापि, केंद्र शासन निर्देशानुसार ११ व्या हप्तापासून लाभार्थ्यांच्या भूमिअभिलेख नोंदी पोर्टलवर अद्ययावत करणे, लाभार्थ्यांची बँक खाती आधार क्रमांकास जोडणे, ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. यासाठी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले असून, टप्प्याटप्प्याने बॅंक खात्याशी आधार सिडींगसह ई-केवायसी जोडणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

असे असूनही जिल्ह्यातील ६३ हजार १४४ लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, तर ३३ हजार २३ शेतकऱ्यांचे बँक खात्याशी आधार जोडणी केलेली नाही. असे एकूण ९६ हजार १६७ लाभार्थी शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्ह्यात ४ लाखाहून अधिक लाभार्थी

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) दोन हजार रुपये प्रतिहप्ता याप्रमाणे तीन हप्त्यांत सहा हजार रुपयांचा लाभ दरवर्षी त्यांच्या बँक खात्यात थेट (डीबीटीद्वारे) जमा करण्यात येतो.

या योजनेच्या सुरवातीपासून एकूण १३ हप्त्यांत जिल्ह्यातील ४ लाख ३० हजार ४६६ शेतकरी लाभार्थी आहेत. त्यापैकी बहुतांश लाभार्थ्यांना १३ व्या हप्त्यापर्यंत लाभ देण्यात आले आहेत. केंद्र सरकार स्तरावर योजनेच्या एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीतील १४ व्या हप्त्याचे नियोजन सध्या सुरू असून, मे २०२३ मध्ये या हप्त्याचा लाभ दिला जाईल.

तालुकास्तरावर नोंदी अद्यावत करा

बँक खाती आधार क्रमांकास जोडणे व ई-केवायसी प्रमाणीकरण करणे या दोन्ही बाबींची पूर्तता लाभार्थ्याने स्वत: करायच्या असून, भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांनी संबंधित तहसीलदार तथा तालुका नोडल अधिकारी पीएम किसान यांच्याकडून नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात.

केंद्र, तसेच राज्य असा दुहेरी लाभ

पीएम किसान योजनेतील पात्र लाभार्थी राज्य शासनाने २०२३- २०२४च्या अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ या योजनेसाठीदेखील पात्र राहतील. त्यांना पीएम किसान योजनेप्रमाणे अतिरिक्त सहा हजार रुपये वार्षिक देय राहतील. पीएम किसान योजनेच्या १४ व्या व त्या पुढील हप्त्यांचा लाभ मिळण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तालुकानिहाय लाभार्थी लिंकिंग अपूर्णता

तालुका आधार सिडींग ईकेवायसी

* जळगाव १९८७ ३८०२

* जामनेर २८७४ ४१३५

* मुक्ताईनगर २०३५ ३५४४

* अमळनेर २८३४ ६१३४

* भडगाव १७६६ ३६१९

* भुसावळ १२३६ १९६०

* बोदवड १३१५ ३४१५

* चाळीसगाव ३२३३ ७८७२

* चोपडा २४६८ ३८२२

* धरणगाव १९४६ २८४८

* एरंडोल १९२२ ३०३९

* पाचोरा २०८९ ५५४४

* पारोळा २२५२ ५७०९

* रावेर २६१८ ४०४९

* यावल २७९८ ३६५२

* एकूण ३३०२३ ६३१४४

"शेतकरी लाभार्थ्याने स्वत:च्या सोयीनुसार ई-केवायसी पडताळणीसाठी पीएम किसान पोर्टलवरील https://pmkisan.gov.in/ या लिंकद्वारे किंवा सामाईक सुविधा केंद्र (सीएससी) या दोनपैकी एका सुविधेच्या आधारे ई-केवायसी पडताळणी करावी. तसेच, बँकेत समक्ष जाऊन आपले बँक खाते आधार क्रमांकास जोडून घ्यावे. या तीन बाबींची पूर्तता केलेल्या पात्र लाभार्थ्यांनाच पुढील हप्त्याचा लाभ अदा केला जाईल." -रविंद्र भारदे, नोडल अधिकारी, पीएम किसान योजना.