mahavitran
mahavitransakal

जळगाव जिल्ह्यात २५ हजारांवर कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित

विजबिलांसाठी अडवणूक, रब्बी हंगाम धोक्यात


जळगाव : जिल्ह्यात वीजबिले भरल्याशिवाय कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरू करणार नाही, असे आडमुठे धोरण वीज कंपनीने घेतले आहे. यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. शेतकरी अडचणीत असताना वीजबिले कशी भरणार, असा प्रश्‍न आहे.

सुमारे २५ हजार कृषिपंपांचा वीजपुरवठा जळगाव, जामनेर, चोपडा, यावल, पाचोरा, रावेर, भुसावळ आदी भागांत बंद करण्यात आला आहे. चोपडा येथे शेतकऱ्यांनी याविरोधात आंदोलन केले. पण प्रशासन शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात न घेता आपली मनमानी करीत आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात जळगाव, धरणगाव तालुक्यांतही शेतकरी त्रस्त आहेत, पण पालकमंत्री लक्ष देत नाहीत. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे विरोधात असताना वीज कंपनीच्या विरोधात शिंगाडा मोर्चा काढायचे. आता कुठे गेले शिंगाडे, असा संतप्त प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत. रब्बी हंगामातील पिकांची पेरणी रखडली आहे. कोरडवाहू हरभऱ्याचीच पेरणी झाली आहे. मका, गहू, कांदा आदी पिकांची पेरणी, लागवड रखडली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. कारण पेरणीला विलंब होत आहे.

दुसरीकडे वीज कंपनी शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहे. वीज कंपनीने आकारलेली बिले चुकीची किंवा अवास्तव आहेत. ती कशी शेतकरी भरणार. वीजपुरवठा सुरळीत नाही. रोहित्र खराब झाले आहेत. ते शेतकरी स्वखर्चाने दुरुस्त करतात. तारा जीर्ण आहेत. फ्यूजपेट्या खराब आहेत. कवडीचा दुरुस्ती खर्च वीज कंपनीने शिवारात केला नाही. पण वीजबिले अवास्तव आकारतात. पावसाळ्यात अशी मोहीम का राबविली नाही, असा संतापही शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com