Jalgaon News : शिवरायांच्या काळात अफजल खान, औरंगजेब अशी ही लूटमार करणारी होती. त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी बंदोबस्त केला होता. त्याचप्रमाणे आता जळगावात ‘गुलाबो गॅंग’ असून, लूटमार, लफंगेगिरी करणारी टोळी आहे. (Sanjay Raut statement about gulabrao patil gang jalgaon news)
आताही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारच खानदेशातील या ‘गुलाबो गँग’चा नायनाट करेल, असा सणसणीत टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यानी जिल्ह्याचे पालकमंत्री शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांना लगावला आहे. पिंप्राळा येथील शिवस्मारक भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.
जळगाव येथील पिंप्राळा येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन खासदार संजय राऊत यांच्याहस्ते करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यास उन्हामुळे विलंब होत असल्याने खासदार संजय राऊत यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार अरविंद सावंत, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ आदी उपस्थित होते. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी प्रास्ताविक केले.
संजय राऊत म्हणाले, की व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी शिवसेनेची तोफ आहेत. त्यामुळे जे कोणी घुसायची भाषा करत आहेत त्यांना येऊ द्या, असा इशाराही त्यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली आहे. त्यामुळे आम्हाला शिवाजी महाराज यांचे विचार सांगण्याची गरज नाही. पिंप्राळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्यास याच ‘गुलाबो गॅंग’ने अनेक अडथळे आणले, हेदेखील आम्हाला माहीत आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
मात्र ते दूर झाले आहेत. छत्रपती शिवरायांच्या काळात अफजलखान, औरंगजेब अशी रयतेला लूटमार करणारी गँग होती. तशीच गँग आता जळगाव जिल्ह्यात लूटमार व लफंगेगिरी करणारी ‘गुलाबो गँग’ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक पूर्ण झाल्यावर त्यांना त्यांच्या आसपासही फिरकू देऊ नका. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जनतेत आहे आणि हाच विचार खानदेशातील ‘गुलाबो गँग’चा नायनाट करणार आहे.
दगडाचे नव्हे, हे तर खोक्याचे भ्रष्टाचारी : अंबादास दानवे
राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, आम्ही दगड मारून संघर्ष करतो, असे ते म्हणतात. आता हे दगड मारणारे नव्हे, तर खोके घेणारे भ्रष्टाचारी झाले आहेत. त्यांच्यातील स्वाभिमान नष्ट झाला आहे. त्यामुळे त्यांनी आता अशा वल्गना करू नये.
त्यांच्यामुळे शिवसेना संपणार नाही, तर उलट ताकदीने उभी राहील, असा टोलादेखील त्यांनी लगावला. या वेळी खासदार अरविंद सावंत, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. हर्शल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.