Eknath Shinde : बाळासाहेबांचा आशीर्वाद.. सत्याचा विजय; शिंदे गटातील नेत्यांची भावना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election Commission given shivsena symbol to shinde group

Eknath Shinde : बाळासाहेबांचा आशीर्वाद.. सत्याचा विजय; शिंदे गटातील नेत्यांची भावना!

जळगाव : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत एकनाथ शिंदेंच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांनी त्याचे स्वागत केले.

बाळासाहेबांचा आशीर्वाद कामी आला.. खरी शिवसेना (Shivsena) आमचीच, हे सिद्ध झाले.. सत्याचा विजय झाला.. अशा भावना शिंदे गटाने व्यक्त केल्या. (shinde thackeray group reaction on Election Commission has favor Eknath Shinde regarding Shiv Sena party symbol jalgaon news)

तर, हा निवडणूक आयोगाचा निर्णय सत्तेच्या दबावातून झालेला आहे. न्यायालयात आमची लढाई सुरू असून, कायदेशीरदृष्ट्या आमचीच शिवसेना खरी असल्याचे लवकरच सिद्ध होईल, असा सूर ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रियेतून उमटला.

जनतेच्या मतांचा आदर

"जास्त आमदार, खासदार आमच्याकडे आहेत, त्यांना लाखो लोक निवडून देत असतात. त्याच जनमताचा आदर निवडणूक आयोगाने केला आहे. आम्ही शिवसेना ‘हायजॅक’ केलेली नाही, तर बाळासाहेबांची भूमिका आम्ही बदललेली नाही, तसेच बदलू नये हेच या निकालातून दिसून आले आहे. आम्ही कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीतून आलेलो नाही, आम्ही मूळ शिवसेनेचेच आहोत."

- गुलाबराव पाटील, पालकमंत्री

खरे वारसदार सिद्ध

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेल्या खऱ्या शिवसेनेलाच धनुष्यबाण मिळाल्याचा मोठा आनंद आहे. या निर्णयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांचे वारसदार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे." - किशोर पाटील, आमदार

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

सत्याचाच विजय

"सत्य हे नेहमी सत्य असते. त्यामुळे आजचा निकाल हा सत्याच्या बाजूने लागला असून, शिवसैनिकांना यामुळे निश्चितपणे नैतिक बळ मिळेल. शिवसेना पक्ष तळागाळात रुजलेला पक्ष असून, या निर्णयामुळे संघटनवाढीसह पक्षाला आणखी बळकटी मिळेल." - चिमणराव पाटील, आमदार

सत्य परेशान हो सकता है..

"सत्य परेशान हो सकता है.. पराजित नही.’ वंदनीय बाळासाहेब, आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता. संख्याबळही आमच्यासोबत होते. त्यामुळे ठाकरे गटाचा दावा कुठेही टिकणार नव्हता. अखेर सत्याचा विजय झाला." - प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार

जनता उत्तर देणार

"हा सत्याचा नव्हे, दडपशाही, असत्याचा विजय आहे. आयोग दबावाखाली निर्णय देतेय. त्यामुळे त्यातून खचून न जाता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही संघटन वाढवून जनतेसमोर जाऊ. जनताच आता या दडपशाहीला उत्तर देऊन आमची सेना खरी शिवसेना असल्याचे सिद्ध करेल."

- विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट

हुकूमशाहीचा वापर

"केंद्रात पंतप्रधान मोदी तर राज्यात एकनाथ शिंदे हे हुकूमशाही पद्धतीने सरकार चालवीत आहेत. सत्तेचा गैरवापर करून धनुष्यबाणाच्या चिन्हावर असांविधानिक पद्धतीने ताबा मिळवला आहे. मात्र आज देखील लोकांच्या मनातील शिवसेना ही उद्धव ठाकरेंची शिवसेना राहील."

- डॉ. हर्षल माने, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट