girna dam
girna damsakal

गिरणा धरणातून मिळणार तीन आवर्तने

२२ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली; १६० गावांचा पाणीप्रश्‍न मिटला

जळगाव : यंदा पूर्ण भरलेल्या गिरणा धरणातून जिल्ह्यासाठी तीन आवर्तने सोडण्यात येणार असल्याचा निर्णय शनिवारी (ता. ४) पाणी आरक्षण, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. नियमानुसार गिरणा धरणातून दोनच आवर्तने मिळणार असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकरी, लाभक्षेत्राच्या परिसरातील जनतेचे हित लक्षात घेता तिसरे अतिरिक्त आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

या अनुषंगाने गिरणा धरणातून अनुक्रमे १५ डिसेंबर, १५ जानेवारी आणि १ मार्च रोजी तीन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. तर पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी पाटबंधारे विकास खात्याने तयार केलेल्या १२ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचे निर्देश देखील मंत्री पाटील यांनी दिले आहेत. यामुळे गिरणातील पाण्याचा शेवटच्या शेतकऱ्यालाही लाभ मिळणार आहे. जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समिती, कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अधीक्षक अभियंता एस. डी. दळवी, पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता वाय. के. भदाणे, गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. पी. अग्रवाल, सदस्य लताबाई धनगर, दत्तू ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, महसूलचे नायब तहसीलदार अमित भोईटे, पाटबंधारे विभागाचे डी. बी. बेहेरे, मध्यम प्रकल्पाच्या अदिती कुलकर्णी, आयुक्त सतीश कुलकर्णी, मजिप्रा अधीक्षक अभियंता एस. सी. निकम, कार्यकारी अभियंता जी. एस. भोगवडे उपस्थित होती.

जळगाव जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर तीन मोठे प्रकल्प असून यावर १३८ गावे अवलंबून आहेत. बोरी, भोकरबारी, मन्याड, अंजनी, अग्नावती, बहुळा, तोंडापूर, हिवरा आणि गुळ या मध्यम प्रकल्पांवर १०१ गावे अवलंबून आहेत. ४० लघू प्रकल्पांचा १४३ गावांना लाभ होतो. अर्थात, तिन्ही प्रकारातील प्रकल्पांचा जिल्ह्यातील ३८२ गावांना लाभ होतो. या सर्व प्रकल्पांमधील पाणी आरक्षणाला या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली.

१६० गावांचा पाणीप्रश्‍न मिटला

गिरणा धरण १९६९ मध्ये पूर्ण झाले. ५२ वर्षात ते १२ वेळेस पूर्ण भरले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हे धरण लागोपाठ १०० टक्के क्षमतेने भरले आहे. यंदा देखील धरण पूर्ण भरल्याने यातील पाण्याचा चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, जळगाव, धरणगाव, अमळनेर तालुक्यातील २२ हजार २८१ हेक्टर जमिनीला सिंचनासाठी लाभ होणार आहे. याच तालुक्यांमधील १६० गावांना पिण्याच्या पाण्यासाठीही याचा लाभ होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com