संगोपनासोबतच गतिमंदांना स्वावलंबी बनविणारे "आश्रय'!

live photo
live photo

 
जळगाव : गतिमंद प्रौढांचा प्रश्‍न अलीकडे समाजात मोठा बिकट बनला आहे. गतिमंद म्हणून त्यांना हिणवले जाते, तर दुसरीकडे जसे वय वाढते, तसे त्यांचे संगोपन करणे पालकांनाही कठीण जाते. अशा उपेक्षित घटकांच्या संगोपनासाठी केशवस्मृती प्रतिष्ठानच्या पुढाकाराने "आश्रय माझे घर' हा अभिनव प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. काही पालकांच्या मदतीने चालविल्या जाणाऱ्या या केंद्रात गतिमंद प्रौढांच्या संगोपनाबरोबरच त्यांना काही कामांत गुंतवून ठेवत स्वावलंबी बनण्याचे धडेही दिले जात आहेत. 
गतिमंद मुलांच्या संगोपनासाठी, त्यांच्या शिक्षणासाठीच्या शाळा समाजात आहेत. काही खासगी संस्थांच्या माध्यमातूनही अशी केंद्रे चालविली जातात. मात्र, वयात आलेल्या म्हणजे, 18 वर्षांवरील गतिमंद व्यक्तींचे संगोपन करणारी शाळा नाही किंवा तसे केंद्रही नाही. मात्र, या गतिमंद व्यक्तींचे जगणे तर इतरांपेक्षा अधिकच कठीण असते. वस्तीत राहणे कठीण आणि पालकांकडून सांभाळ होणे कठीण असते. असे असताना या उपेक्षित घटकांना सांभाळून घेणे खरेतर मोठे आव्हान आहे. 

"केशवस्मृती'चा पुढाकार 
विविध प्रकल्पांच्या माध्यमातून समाजात "सेवाव्रता'चा आदर्श निर्माण करणाऱ्या केशवस्मृती प्रतिष्ठानने समाजातील या घटकांची गरज ओळखत हे आव्हान स्वीकारले आणि गतिमंद प्रौढांसाठी "आश्रय माझे घर' प्रकल्प सुरू केला. गतिमंद व्यक्तींच्या पालकांनी हा प्रकल्प सुरू करण्यासाठी केशवस्मृती परिवाराला सहकार्य केले आणि दोन वर्षांपासून "आश्रय'चे काम सुरू झाले. 

संगोपनासाठी पूर्णवेळ स्वयंसेवक 
सावखेडा शिवारात मातोश्री वृद्धाश्रमाच्या आवारात स्वतंत्र इमारतीत हा प्रकल्प असून, त्यात गतिमंद प्रौढांच्या निवासासह संगोपनाची संपूर्ण जबाबदारी प्रकल्पातील स्वयंसेवकांवर आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या व्यक्तींची "सेवा' करण्यासाठी प्रकल्पात पाच स्वयंसेवक आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय मानसोपचारतज्ज्ञ, प्रकल्पाचे व्यवस्थापक, स्वयंपाकी, प्रकल्पप्रमुख अशी यंत्रणा कार्यरत आहे. गतिमंदांना दोन वेळा चहा, दोन वेळचा नाश्‍ता व दोन वेळा जेवण पुरविले जाते. 

स्वावलंबनाचे धडे 
केवळ संगोपनच नव्हे; तर या गतिमंदांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना दिवसभर विविध कामांमध्ये अडकवून ठेवले जाते. इमारतीतील खोल्या झाडणे, अगरबत्ती, कागदी पिशव्या बनविणे, पणत्यांना रंग देणे आदी कामे त्यांच्याकडून करून घेतली जातात. या व्यक्ती ही कामे आनंदाने करतात. त्यांच्या मनोरंजनासाठी घरातले व मैदानी खेळही खेळविले जातात. 
 
वाढदिवस होतात साजरे! 
18 ते 54 वर्षे वयोगटातील 13 गतिमंद पुरुष या ठिकाणी वास्तव्यास आहेत. महिन्यातून एक- दोनदा त्यांच्या पालकांना भेटू दिले जाते. पालक या गतिमंदांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून येतात. एकत्रितपणे त्यांचे वाढदिवस नियमितपणे साजरे केले जातात. वयातील गतिमंद व्यक्तींचे संगोपन करणारा हा खानदेशातील एकमेव प्रकल्प आहे, अशी माहिती प्रकल्पाच्या प्रमुख कविता दीक्षित यांनी "सकाळ'ला दिली.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com