बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली भरारी

Biscuits
Biscuits

सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील उपक्रमशील महिला सौ.अंजली विश्‍वजीत दळवी यांनी सद््गुरू स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्या माध्यमातून तयार केलेल्या विविध प्रकारच्या बिस्किटांनी गुणवत्ता व चवीच्या जोरावर ग्राहकांमध्ये विश्‍वास निर्माण केला आहे. आरोग्यदायी बिस्किटाच्या व्यवसायातून अंजली दळवी व सद््गुरू महिला बचतगटाच्या महिलांनी सीमोल्लंघनच केले आहे. 

इस्लामपूर शहरापासून अवघ्या दहा  किलो मीटर अंतरावर नवेखेड गाव लागते. पहिले डबल महाराष्ट्र केसरी पै. स्व. गणपतराव खेडकर यांचे हे गाव. याच गावातील सौ. अंजली दळवी या यशस्वी महिला होत. पहिल्यापासून उपक्रमशील असलेल्या सौ. अंजली दळवी यांनी एक बचतगट स्थापन केला. त्यामध्ये मासिक बचत गोळा करणे, बॅंकेत भरणे, गटातील महिला सदस्यांना गरजेप्रमाणे जमा रक्कम कर्ज म्हणून वाटणे  अशी कामे सुरू झाली. २०१७ मध्ये पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या आग्रहावरून त्यांनी गटाची शासकीय नोंदणी केली. 

 सुरुवातीला मसाला निर्मिती
अंजलीताईंनी सुरवातीला बचतगटांचे आरसीटी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मसाले व लोणचे निर्मितीला प्रारंभ केला. मिरची मसाला, गरम मसाला, चिवडा मसाला या सोबत चहा मसालाही त्या तयार करत.  घराजवळून शेतात जाणाऱ्या महिलांना थांबवून त्या मसाल्याचे नमुने देत. गावात हळदीकुंकू कार्यक्रमासाठी गेल्यावर महिलांना त्या विविध मसाल्याच्या छोट्या पुड्या देत. त्यातून लोकांमध्ये मसाल्याविषयी माहिती होऊ लागली. वास्तविक दळवी कुटुंबीयांची४ एकर शेती. शेतात ऊस, सोयाबीन, भुईमूग अशी पिके असतात. शेतीची कामे, घरकाम यासोबतच त्यावेळी घरामध्ये ३ म्हशी होत्या. त्यांचा चारा, पाणी असा सगळा व्याप होता. घरामध्ये पती, तीन मुले यांच्यासह सासूबाईही हा आणखी व्याप कशाला वाढवतेस, तुझीच ओढाताण होईल, असे काळजीने म्हणत. मात्र, अंजलीताईंना आपणही काहीतरी करावे, स्वतः काही आर्थिक प्राप्ती करावी, असे वाटत असे. आपले स्वतःचे छोटे ध्येय त्यांनी ठरवले होते. त्यावर ठाम राहत घरातील कोणतीही जबाबदारी न टाळता मसाले निर्मितीचा घरगुती व्यवसाय सुरुच ठेवला. 

      मिळाला आत्मविश्वास...
इस्लामपूर येथे भरलेल्या दख्खन यात्रा प्रदर्शनात पहिल्यांदा स्टॉल लावला. त्यात त्यांच्या मसाल्यांची सुमारे ५००० रुपयांची विक्री झाली. येथे गरम मसाला आणि चहा मसाल्याला चांगली मागणी मिळाली. लोकांच्या प्रतिसादामुळे या कामातील संधी लक्षात आली. स्टॉलवर त्यांच्यासोबत असलेल्या महिलेच्या बिस्किटांची विक्री अधिक वेगाने होत असल्याचे दिसून आले. मग त्यांनी अंकलखोप येथील या महिलेकडून होलसेल दराने बिस्किटे आणून गावामध्ये विक्रीला सुरवात केली. लोकांकडून या बिस्किटांना मागणी हळूहळू वाढत चालली.  

बिस्कीट निर्मितीकडे लक्ष
ग्रामीण भागांमध्ये स्वतःच घरगुती पातळीवर मसाला तयार केला जात असल्याने त्यांच्या मसाल्यांना मागणी कमी असल्याचे जाणवले. मग त्यांनी बिस्कीट निर्मितीमध्ये उतरण्याचे ठरवले. २०१८ मध्ये सुमारे सव्वा लाख रुपये खर्च करून छोटे पीठ मळणी यंत्र व ओव्हन खरेदी केला. सुमारे ९ हजार रुपये भरून इचलकरंजी येथून बिस्किटे व बेकरी उत्पादनांच्या निर्मितीची विविध प्रशिक्षणे घेतली. त्यातील अनेक बारकावे आत्मसात केले.

हेही वाचा : अकोले तालुक्यात डांगी गोवंशाचे संवर्धन

बिस्कीट निर्मिती व्यवसायात हातखंडा
बाजारामध्ये मैद्याची बिस्किटे खूप उपलब्ध आहेत. आरोग्यासाठी उत्तम म्हणून मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरत बिस्किटांची निर्मिती सुरू केली. त्यातही कोणतीही प्रीझर्वेटिव्ह किंवा रसायनांचा वापर त्या करत नाहीत. परिणामी घरगुती, उत्तम दर्जाच्या आरोग्यदायी बिस्किटांचा स्वतंत्र ग्राहकवर्ग मिळत गेला. ‘दर कमी, पण क्वॉलिटीची हमी’ अशी त्यांची टॅगलाईनच आहे.   

सामान तुमचे, मजुरी आमची
ग्रामीण भागात बिस्किटे कोण घेणार, हा प्रश्‍न होताच. ओव्हन आणि यंत्राचा वापर सतत होत राहणे आवश्यक होते. त्यामुळे अंजलीताईंनी ‘सामान तुमचे, मजुरी आमची’ ही संकल्पना राबवली. एक किलो गहू पीठ, अर्धा किलो तूप, अर्धा किलो दूध, अर्धा किलो साखर असे साहित्य दिल्यास त्यापासून दीड ते दोन किलो तयार बिस्किटे मिळतात. त्यासाठी ७० रुपये इतकी मजुरी त्या आकारतात. कोणत्याही सामानाशिवाय बिस्किटांची विक्री १६० रुपये किलो प्रमाणे केली जाते.  

   १८ प्रकारची बिस्किटे...
गहू, नाचणी, बाजरी यापासूनही उत्तम बिस्किटे त्या बनवतात. त्यातही शुगरफ्री, काजू, कस्टर्ड, नाईस, नानकटाई, कॅडबरी, ओट बनाना, मिल्क इलायची, डार्क चॉकलेट अशा १८ प्रकारची बिस्किटे त्या तयार करतात. गहू, नाचणी शुगर फ्री, काजू, नानकटाई यांना ग्राहकांची चांगली मागणी असल्याचे अंजलीताईंनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  इतर महिलांना मार्गदर्शन
सद््गुरू महिला बचत गटातील महिलांची बिस्किटे निर्मितीमध्ये मदत घेतली जाते. गावातील अन्य  महिलाही दळवी यांच्या संपर्कात आल्या. त्या महिलांना वेगवेगळ्या उद्योगांसाठी प्रोत्साहित करत असतात. त्यातून काही महिलांनी आपले छोटे मोठे उद्योग सुरू केले आहेत. 

  पुरस्काराची मोहोर 
सद्गुरू महिला बचत गटाचे कामातील सातत्य, दर्जेदारपणा, ग्राहक या बाबतीत विचार करता सौ. अंजली दळवी यांना डीआरडीए मार्फत दिला जाणारा जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याच बरोबर हिरकणी, नवउद्योजक महाराष्ट्राचे असे पुरस्कारही मिळाले आहेत. 

  मुलांना उच्चशिक्षण
घरकाम, बिस्किटे निर्मिती व्यवसाय यासोबतच कुटुंबाचा सर्व व्याप सांभाळताना अंजलीताईंनी आपल्या मुलांची शिक्षणाकडे दूर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांचा मुलगा प्रीतेश हा बीटेक (ॲग्री इंजिनिअरिंग) झाला असून, दुसरा मुलगा प्रीतम बीटेक च्याच अंतिम वर्षात आहे. मुलगी प्रियांका हिनेही अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. 
 : सौ.अंजली दळवी, ९८२३७५६८६९

   नवनिर्मितीवर भर
बिस्कीट निर्मिती व विक्री यामध्ये यशस्वी होत असतानाच अंजलीताईंनी ग्राहकांची मागणी व गरज यांचा विचार करत साधे केक, आईस केक, खारी, लादीपाव, डोनट, ब्रेड निर्मिती सुरू केली. आवश्यक तिथे प्रशिक्षण घेत आत्मविश्वासाने त्या पुढे जात आहे. उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी नुकतेच अधिक क्षमतेचे ओव्हन व काही यंत्रे खरेदी केली आहेत. या सर्व उत्पादनांना उद्योग आधार व आवश्यक ते परवाने घेतले आहेत. आता उत्पादनांचा ब्रॅण्ड निर्मिती व पॅकेजिंगवर लक्ष केंद्रित केले असल्याचे त्या सांगतात. बचतगट अभियान व्यवस्थापक अशुतोष यमगर, समन्वयक विजय पाटील यांचे मोलाचे सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले. 

वैशिष्ठ्ये बिस्किटांची...
बाजारातील बिस्किटांमध्ये मैदा असतो, त्याऐवजी आरोग्यदायी अशा गहू, नाचणी, बाजरी अशा पिठांचा वापर. 
कोणत्याही प्रीझर्वेटिव्हचा वापर करत नाहीत.
केवळ ‘माऊथ पब्लिसिटी वर आजवर मारली मजल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com