सौरऊर्जा निर्मितीतून वीज वापरात स्वयंपूर्ण 

सौरऊर्जा निर्मितीतून वीज वापरात स्वयंपूर्ण 

सातारा - आपल्या रोजच्या गरजेपैकी 70 ते 80 टक्के विजेची निर्मिती आपल्याला छतावर करता येते. त्यातून विजेच्या बचतीबरोबरच पैशांची बचतही होते. उन्हामुळे इमारत गरम होऊन भोवतालचे वाढणारे तापमान रोखण्यात मदत मिळते. ऊर्जेबाबत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करणाऱ्या देवी चौकातील एका इमारतीमुळे गेल्या दोन वर्षांत तब्बल सहा लाख रुपयांची वीज व तेवढ्याच पैशांची बचत झाली आहे. 

पर्यावरण, क्रीडा आदी क्षेत्रात कार्यरत असणारे कन्हैय्यालाल राजपुरोहित यांच्या मालकीची ही इमारत आहे. राजपथावर "राजपुरोहित स्वीट्‌स' या सुमारे दहा हजार चौरस फूट बांधकाम क्षेत्र असलेल्या या इमारतीचा वापर रहिवास व वाणिज्य अशा दोन्ही कारणांसाठी होतो. दोन वर्षांपूर्वी त्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली इमारतीच्या छतावर सौरऊर्जेची पॅनेल बसविली. त्यातून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत निर्माण होणारी वीज या इमारतीमध्ये वापरली जाते. शिवाय दिवसभरात गरजेपेक्षा अधिक निर्माण होणारी वीज कंपनीला पाठविली जाते. रात्री गरजेनुसार तेवढीच वीज कंपनी श्री. राजपुरोहित यांना विनामोबदला उपलब्ध करून देते. त्यामुळे महिन्याकाठी या इमारतीच्या माध्यमातून वीज बिलापोटी 25 हजार रुपयांची बचत होऊ लागली. 

हा प्रयोग आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरील भार कमी करणारा असल्याने श्री. राजपुरोहित यांनी विसावा नाक्‍यावरील दुसऱ्या इमारतीच्या छतावरही सौर पॅनेल बसविली. याही ठिकाणी महिन्याकाठी 12 हजार रुपयांची वीज बचत होत आहे. आपल्या अनुभवाविषयी सांगताना कन्हैय्यालाल राजपुरोहित म्हणाले, ""आपल्या इमारतीवर, आपणच आपल्याला लागणाऱ्या विजेची निर्मिती करतो, हा अनुभव मनस्वी समाधान देणारा आहे. सौर ऊर्जेमुळे दोन महत्त्वाचे लाभ मिळाले. एक म्हणजे छतावर सोलर पॅनेल बसविल्याने इमारतीवर ऊन पडत नाही. परिणामी इमारतीमधील तापमान कमी राखण्यास मदत होते. इमारतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांचे प्रसरण-आकुंचन कमी होते. इमारतीचे आयुष्यमान वाढते. दुसरे म्हणजे आपण वीज कंपनीकडून वीज घेतो. कंपनीकडे विजेचा तुटवडा असतो. त्यामुळे लोकांना भारनियमनाला तोंड द्यावे लागते. सौर ऊर्जेच्या वापराने वीज कंपनीवरील आपला भार कमी होतो. आपल्याला खात्रीशीर वीज मिळते.'' 

केवळ सुरवातीस गुंतवणूक करावी लागते. दरमहाच्या वीज बचतीमधून साधारण पाच वर्षांत आपली गुंतवणुकीची रक्कम मोकळी होते. त्यापुढे होणारी बचत हा निव्वळ फायदा असतो. देखभाल खर्चही फार कमी असतो, असेही श्री. राजपुरोहित यांनी नमूद केले. आमच्याकडे डीप फ्रीजर, एअर कंडिशनर, बॉटल कुलर यांचा वापर अधिक असल्याने संध्याकाळी कंपनीची वीज घ्यावी लागते. सोलर पॅनेल ठेवण्यासाठी आमचे छत अपुरे पडते. त्यातूनही आमची रोजची सुमारे 70 टक्के गरज पूर्ण होते. घरगुती ग्राहक तसेच छोट्या व मध्यम गरजेसाठी सौर वीज पुरेशी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

प्रत्येक नागरिकाने आपल्या छतावर सौरऊर्जेची पॅनेल बसवावीत. सौरऊर्जा मोफत मिळते. आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. सार्वजनिक व्यवस्थेवरील भार कमी करणारे आहे. आपल्या इमारतीचे तापमान कमी राखण्यास त्याचा उपयोग होतो. त्यातून इमारतीमध्ये पंखे किंवा एसीचा वापर कमी होऊन आणखी वीज व पैशांची बचत होते.  
- कन्हैय्यालाल राजपुरोहित, सातारा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com