कोरोना प्रतिबंधासाठी कोकणात जमावबंदी
रत्नागिरी - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. संसर्गाचा उद्रेक टाळण्यासाठी जिल्ह्याच्या सर्व प्रवेशद्वारावर विशेष पथकांची नेमणूक करून थर्मल कॅमेऱ्याद्वारे त्यांचे स्क्रिनिंग केले जाईल. ग्रामीण भागातील शाळांसह, कॉलेजे, उद्याने, धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परदेशातून येणाऱ्यांची ट्रॅव्हल्स, टुर्स कंपन्यांकडुन यादी घेऊन बाधित देशातून येणाऱ्यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनाराणय मिश्रा यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, विषाणू बाधित क्षेत्रातून आलेल्या प्रत्येकाने स्वतःची व कुटुंबाची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूची लक्षणे 15 दिवस दिसत नाहीत. त्यामुळे 15 ते 20 दिवस राहून अशा प्रवाशांनी याचा प्रसार रोखण्यास मदत करावी. कोरोनाचा उद्रेक होऊ नये, यासाठी सर्व मार्गावर तसेच जिल्ह्याच्या सर्व प्रवेशद्वार, रेल्वे स्थानकं, बसस्थानकावर प्रवाशांची किंवा येणाऱ्यांची थर्मल कॅमेराने तपासणी करण्यात येणार आहे. देश- विदेशातून येणाऱ्यावर आमची खास नजर राहणार आहे.
जिल्ह्यात क्वॉरंटाईनसाठी रत्नागिरीत एमआयडीसी रेस्टहाऊस, दापोली, कामथे, राजापूर आदी ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत. कोणालाही संशय असल्यास त्यांनी 226284 या दूरध्वनीवर संपर्क करा. परदेशातून येणाऱ्या पाच जहाजांची तपासणी करण्यात आली . आतापर्यंत 350 लोकांची तपासणी झाली. मात्र त्यामध्ये एकही बाधित आढळलेला नाही. गाव पातळीवर याची माहिती किंवा तत्काळ उपाययोजना व्हावी, यासाठी तलाठी, पोलिस पाटील, अंगणवाडीसेवीका आदींना माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील काही डॉक्टरांना पुण्यामध्ये ट्रेनिंग दिले आहे.यावेळी निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे आदी उपस्थित होते.
सॅनिटायझरची कमतरता
जिल्ह्यात सॅनिटायझरची कमतरता भासत आहे. जास्त दरातमध्ये ती खरेदी करून साठवून ठेवली आहेत. मास्कची देखील तिच परिस्थिती आहे. आम्ही मेडिकलना भेटी देऊन ती जास्त प्रमाणात उलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. आम्ही बचत गटांना मास्क तयार करण्याबाबत प्रेरित करीत आहोत. तसेच एमआयडीसीमध्ये कोण सॅनिटायझर तयार करतील का, याबाबत ंबोलणी सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक कार्यान्वित
चिपळूण ः कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण राज्यात आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कुंभार्ली घाटात आरोग्य विभागाची पथके तैनात करण्यात आली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहन चालकांची तपासणी करण्यात आली.कोरोना विषाणूच्या माहितीसाठी स्वतंत्र माहिती कक्ष व मदत केंद्राची स्थापना केली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक कार्यान्वित करण्यात आला. त्याची माहिती प्रवाशांना दिली जात होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.