आता भरणार ‘आगरी बोली शाळा’

tare
tare

पाली (रायगड) : अागरी बोली भाषेचे जतन व संवर्धन व्हावे तीचा गोडवा जनसामान्यांना समजावा अाणि अधिकाधीक लोकांना ती शिकता यावी म्हणून एक युवा साहित्यिक धडपडत आहे. म्हणूनच युवा साहित्यिक सर्वेश रविंद्र तरे यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘आगरी शाला’ या १० दिवसाच्या आगरी बोली भाषेच्या मोफत प्रशिक्षण वर्गाचे अायोजन केले आहे.

मुंबई-ठाणे-रायगड-नाशिक मधील अनेक स्थानिकांची बोली आगरी अाहे. प्रसार माध्यमात तसेच विविध मालिकांमध्ये सर्रास वापरली जाणारी अागरी बोली तिच्या अनोख्या गोडव्यामुळे सर्वांच्या मनात घर करुन आहे. मात्र अनेकांना या भाषेबद्दल प्रेम असुन देखील तिचे नेमके पैलु माहित नाही अाहेत. 

भाषा शिकण्याची कोणतीही अधिकृत व्यवस्था नसल्याने इच्छा असुनही अनेकांना अागरी भाषा शिकता येत नाही. तसेच इंग्रजी व हिंदीच्या वाढत्या प्रभावामुळे हल्ली आगरी बोलीचा वापर हा कमी होत अाहे. त्यामुळे ही अागरी बोली बोलणाऱ्या वर्गाला ह्या भाषेचा विसर पडत आहे. परिणामी अागरी भाषेचे संवर्धन व प्रसार व्हावा व ज्यांना आगरी बोली शिकायची आहे वा तिच्याबद्दल अधिक माहिती मिळवायची आहे, त्यांच्यासाठी युवा साहित्यिक सर्वेश रविंद्र तरे यांनी १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘आगरी शाला’ या १० दिवसाच्या आगरी बोली भाषा प्रशिक्षण वर्गाचे अायोजन केले आहे. 

प्रशिक्षण वर्ग भिवंडीतील कशेळी गावात भरणार आहेत. या प्रशिक्षण वर्गासाठी आगरी भाषा प्रेमी मग ते कोणत्याही वयोगटातले व कोणत्याही ठिकाणचे असोत त्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रशिक्षणार्थींनी यामध्ये सहभागी व्हावे असे अावाहन सर्वेश तरे यांनी सकाळच्या माध्यमातून केले अाहे. इच्छूकांनी आपली माहिती sarvyatare@gmail.com वर पाठवावी. संपर्क - ९०९६७२०९९९ या आगरी बोलीतील प्रयोगानंतर इतरही बोलीत असे प्रयोग करण्याचा विचार करीत असल्याचे डाॅ.अनिल रत्नाकर यांनी सकाळला सांगितले.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन व पुरक साहित्याचे वाटप

सर्वेश तरे हे स्वत: बोलीभाषा अभ्यासक असून ९० व्या अ.भा साहित्य संमेलनातील बोलीभाषा समितीचे सदस्य होते. या ‘आगरी शाला’ प्रशिक्षण वर्गासाठी काही विषेश तज्ञ-मार्गदर्शकांचाही सहभाग असणार आहे. त्यात आगरी शब्दकोशाचे निर्माते प्रा.सदानंद पाटील, आगरी बोली आणि संस्कृतीचे अभ्यासक मोरेश्वर पाटील, आगरी कवी-साहित्यिक गजानन पाटील,९० व्या अ.भा साहित्य संमेलनाच्या बोलीभाषा कट्ट्याचे अध्यक्ष डाॅ.अनिल रत्नाकर, प्रसिध्द कवी-साहित्यिक प्रकाश पाटील तसेच लोकगीतातील गीतकार संगीतकार दया नाईक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या ‘आगरी शाला’ प्रयोगा अंतर्गत सहभागी प्रशिक्षणार्थींना लघु पाठ्यक्रम असलेले पुस्तकही मिळणार आहे. ज्यात आगरी बोलीतील पद्य आणि गद्य चा समावेश असेल. या पाठ्यक्रमाचे संपादन मोरेश्वर पाटील आणि सर्वेश तरे यांनी स्वत: केले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com