कर्तव्याच्या ध्येयातून आंबडवेत स्मारक

महापरिनिर्वाण दिन विशेष; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव; स्मारक चळवळ प्रेरणादायी
कर्तव्याच्या ध्येयातून आंबडवेत स्मारक

मंडणगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके जगभरात होत असताना त्यांच्या वतनाचा वारसा सांगणाऱ्या आंबडवे गावामध्ये कोणत्याच स्वरूपाचे स्मृती चिन्ह नसावे? जिथे त्यांचे जुने घर आहे, जमीन आहे, याचा विचार शासन, प्रशासन व कोणीही करू नये. ही सल मनात राहिल्याने बाबासाहेबांचे स्मारक बांधणे नैतिक कर्तव्य मान्य करीत कृतीत उतरविण्यासाठी आंबडवे पंचक्रोशीसह मंडणगड तालुक्यातील बहुजन समाजाने पुढाकार घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंदिर कमिटीची स्थापना करीत मुळगावातील स्मारक पूर्णत्वास नेले.

डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीवर प्रबंध लिहिणारी एलियार झेलीयट या अमेरिकन विद्यार्थिनीने ९ फेब्रुवारी १९६५ साली मूळवंशाचा शोध लावत आंबडवे गावी भेट दिली. थोर माणसाच्या घराची दुरवस्था पाहून खेद व्यक्त करीत जिल्हा कार्यालयात अभिप्राय नोंद केला. तत्कालीन जिल्हाधिकारी जे. डी. जाधव यांनी २८ फेब्रुवारी व १४ एप्रिल १९६७ रोजी आंबडवे गावाला भेट दिली. या दोन घटनांची प्रेरणा घेऊन स्मारकासंबंधी विचार सुरू झाले. १४ एप्रिल १९७० ला बौद्धजन सेवा संघाच्या वतीने माजी मंत्री बाबुराव बेलोसे यांच्या अध्यक्षतेखाली शिगवण आंबडवे पंचक्रोशीत शेतकरी मेळावा भरविण्यात आला. प्रमुख पाहुणे बाळासाहेब सावंत होते. मेळाव्यात दापोली व मूळगाव आंबडवे येथे डॉ. आंबेडकरांच्या ध्येयाला पूरक अशी लोककल्याणकारी स्मारके बांधावी, असा ठराव करण्यात आला.

त्यानंतर बाळासाहेब सावंत, भय्यासाहेब आंबेडकर, बाबूराव बेलोसे, आर. जी. रुके, सुमंत गायकवाड, घनश्याम तळवटकर हे समाजनेते व स्मारक मंडळाचे प्रमुख काकासाहेब गुजर, सदानंद धोत्रे यांचे शिष्यमंडळ तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी तीन लाखांपर्यंत स्मारक योजना आखून शासनाला सादर करा, त्याला शासन मान्यता देईल, असे आश्वासन दिले.पाच हजारांचा निधी दिला.

१४ एप्रिल १९७२ रोजी बाबासाहेबांच्या जयंतीदिनी मंडणगड, दापोली तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत स्वयंस्फूर्तीने वर्गणी जमा केली. बेलोसे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या मूळघराच्या घरावर भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. सर्वसाधारण समाजातील शेवटच्या घटकाला शिक्षण मिळावे, हे बाबासाहेबांचे ध्येय कृतीत आणण्यासाठी मंडणगड विकास मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल सुरू करून शिक्षणाची पाळेमुळे घट्ट रोवली. याचे श्रेय तत्कालीन मंडणगड सभापती विठ्ठलराव गोसावी यांना द्यावे लागेल.

५० एकर जमीन स्वखुशीने मंडळाला बहाल

संस्थेने शासनाकडे शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक सोयीने युक्त अशी आश्रम शाळा योजना स्मारक रूपाने मागितली. तत्कालीन समाजकल्याण मंत्री दादासाहेब रुपवते यांनी योजनेला लागणारी जमीन संस्थेला दिली पाहिजे व संस्था सरकारमान्य करावी, असे सांगितले. त्याप्रमाणे आंबडव्याच्या सकपाळ बंधूनी व ग्रामस्थांनी स्वखुशीने ५० एकर जमीन मंडळाला बहाल केली. त्यात स्वतःची पहिली जमीन देण्याचे जाहीर करून प्रेरणा देणारे अर्जुनराव धोत्रे महत्वपूर्ण ठरले. मंडळ रजिस्टर्ड झाल्याने काही देणग्या व एक रुपया निधीतून ५ हजार रुपये जमा करण्यात आले. कारागीर ठरवून इमारतीचा दगड पाडण्यास सुरवात झाली. २८ एप्रिल १९७४ ला श्री. रुपवते यांच्या हस्ते इमारतीचा कोनशीला समारंभ झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com