देशाचा सांस्कृतिक भुगोल भाषावाद आणि प्रांतरचनेपेक्षा मोठा -  अरुणा ढेरे

देशाचा सांस्कृतिक भुगोल भाषावाद आणि प्रांतरचनेपेक्षा मोठा -  अरुणा ढेरे

गुहागर - आपल्या देशाचा सांस्कृतिक भुगोल भाषावाद आणि प्रांतरचनेपेक्षा मोठा आहे. त्यानेच आपण एकसंध आहोत. माणुसकीची भाषाच माणसांना जवळ आणते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. 

गुहागर येथील साहित्य संमेलनामध्ये यवतमाळ येथे होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांची प्रकट मुलाखत प्रा. मिलिंद जोशी आणि आसावरी जोशी यांनी घेतली.

सत्ता आणि राजकारण निरपेक्ष व्यासपीठासाठी निवडणूक हा चुकीचा पायंडा होता. सांस्कृतिक करंटेपणाची ही पध्दत बदलण्यास मी निमित्तमात्र झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठी साहित्य मंडळ आदी अनेक संस्थांनी यात मोलाची भूमिका निभावली. मी हे पद सन्मान म्हणून स्विकारले नसून ही जबाबदारी आहे. 

- अरुणा ढेरे

अरुणा ढेरे म्हणाल्या, आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल होणाची चर्चा निरर्थक आहे. यापूर्वी अनेकवेळा चळवळी, बंड, वादाविना अनेक साहित्यिकांनी विचारांची लढाई स्वबळावर लढली आहे. साहित्यिकाची भूमिका लेखनातून प्रकट होते. जीवनप्रवाहात पुढे जाताना बदल आणि संस्कृतीचे भान ठेवून लिहले पाहिजे.

समन्वय हेच लिखाणाचे सुत्र असले पाहिजे. आपली भाषा शुध्द, योग्य उच्चारांमध्ये बोलतो, लिहितो का याकडे आपणच लक्ष दिले पाहिजे. संशोधकांनी परिश्रम घेऊन लिहिलेले मराठी शब्दकोश, ज्ञानकोश आमच्याकडे असले तरच भाषा समृध्द होईल.

- अरुणा ढेरे

वर्तमानातील महाराष्ट्राची जडणघडण 19 व्या शतकातील भल्याबुऱ्या अनेक घटनांमुळे झाली. विवेकी विचार पुरोगामी राज्यात रुजण्यास 19 वे शतक उजाडावे लागले. सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, पंडीता रमाबाई अशी मोजकी नावे आपल्याला माहिती आहेत. मात्र अनेक महिला याच काळात शिकल्या. ज्या स्त्रीया शिकल्या त्यांच्यामागे कुणी ना कुणी पुरुष उभा होता. पत्नीचे चरित्र लिहिणारे पती याच काळात घडले. हे भारतीय स्त्रीवादाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. स्त्री पुरुष मैत्रीकडे आजही आपण भानगड, गॉसीप म्हणून पाहतो. त्या मैत्रीची प्रतिष्ठेचे भान ठेवणारे स्त्री पुरुषही मला 19 व्या शतकात मिळाले, असेही ढेरे यांनी सांगितले. 

साहित्याबद्दल बोलताना अरुणाताई म्हणाल्या की, साहित्याला काळ नसतो. साहित्यकृती चांगली किंवा वाईट असेच प्रकार होऊ शकतात. आज कित्येक नवीन प्रकारात साहित्य समोर येत आहे. तरीही सामर्थ्यवान साहित्यासाठी साधनेची आवश्‍यकता आहे. आज माध्यमे आणि पुरस्कारांनी खूप नुकसान केले आहे. तत्कालिक प्रसिध्दी, टाळ्या, कौतुक आणि पुरस्कारांमध्ये गुंतून पडलेले संपतात. हे ही लक्षात घेतले पाहिजे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com