चिपळूण ः भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यासाठी रक्तचंदन तस्करीचे प्रकरण दडपण्याचे काम सत्ता वापरून केले जात आहे, असा आरोप गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी आज येथे केला. राज्य सरकारने चिपळूणमध्ये सापडलेल्या रक्तचंदन प्रकरणाचा तपास कर्नाटक सरकारच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी करीत तस्करीच्या विषयाला वेगळेच परिमाण दिले.
जाधव म्हणाले की, चिपळूण शहर परिसरात चार ठिकाणी छापे टाकून सुमारे 15 टन रक्तचंदन वन विभागाने जप्त केले. रक्तचंदनाच्या या तस्करीचा तपास करण्यात वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणात सापडलेले रक्तचंदन वेगवेगळ्या मार्गाने चिपळूणमध्ये येत होते.
रक्तचंदनाचा साठा सापडल्यावर ज्या तत्परतेने आणि वेगाने संबंधितांवर कारवाई करायला पाहिजे होती, ती वन विभागाने केलेली नाही. दक्षिण भारतात मिळणाऱ्या रक्तचंदनाचे साठे चिपळूणमध्ये आणण्यामागे बड्या नेत्याचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. हा नेता राष्ट्रवादीतील नाही; मात्र तो लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. भाजपच्या मित्रपक्षातील मोठा नेता आपल्याकडे येतोय म्हणून राज्य सरकारने हे पाप दडपून टाकू नये. कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता कारवाईचा संपूर्ण तपास कर्नाटक सरकारकडे वर्ग करावा.
|