राऊतांना राज्यात मंत्री होणे आवडेल

राऊतांना राज्यात मंत्री होणे आवडेल

कणकवली - शिवसेनेचा रत्नागिरी सिंधुदुर्गसाठीचा उमेदवार अद्याप निश्‍चित झालेला नाही. श्री. राऊत यांनाही नुसते खासदार होण्यापेक्षा राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्री होणे अधिक आवडेल, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथे व्यक्त केले.

श्री. काळसेकर यांचे हे विधान राजकीय वर्तुळात सुचक मानले जात आहे. भाजप येथील उमेदवारीसाठी आग्रही आहे. या पार्श्‍वभूमीवर काळसेकर म्हणाले, ""लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेना आणि भाजप या दोन पक्षात युती झाली. या युतीचे आम्ही स्वागतच करीत आहोत. परंतु रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेचे विनायक राऊत यांना तीव्र विरोध आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा स्वाभिमान दुखावून आम्ही शिवसेनेशी युती करणार नाही.''

येथील भाजप कार्यालयात श्री काळसेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेला विरोध नाही तर खासदार विनायक राऊत यांच्या उमेदवारीला विरोध आहे. श्री राऊत हे मोदींच्या लाटेवर निवडून आले. त्यांच्या विजयासाठी भाजप कार्यकर्त्यांनी तन-मन-धन अर्पून काम केले. श्री.राऊत निवडून आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गावागावातील विकास कामांसाठी त्यांच्याकडे खासदार निधीसाठी पत्रे दिली. पण युती अभंग असतानाही खासदारांनी भाजप कार्यकर्त्यांचे एकही काम केलेले नाही.

पंतप्रधान श्री मोदी यांनी आणलेल्या अनेक योजनांची तसेच विकास कामांची उद्घाटने देखील श्री राऊत यांनी केली. या कार्यक्रमात देखील त्यांनी एकाही भाजप कार्यकर्त्यांना बोलावले नाही तसेच पंतप्रधान मोदींचे नाव देखील घेतलेले नाही. त्यामुळे राऊत यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांचा प्रचंड रोष आहे. भाजप कार्यकर्त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आंगणेवाडी याचा च्या निमित्ताने आलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र राऊत यांच्या उमेदवारीला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध कायम आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वबळाची भाषा केल्यानंतर आम्हीही रत्नागिरी-सिंधुदुर्गात स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. आजही लोकसभेसाठी सुरेश प्रभू हे उमेदवार असतील यादृष्टीने भाजपची प्रचार यंत्रणा कार्यरत आहे. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेची विनिंग सीट असल्याने तेथे शिवसेनेचा उमेदवार असण्याची शक्‍यता आहे. मात्र शिवसेनेने आपला उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे राऊत हे राज्यात कॅबिनेट मंत्री असतील अशी शक्‍यता आहे. असेही काळसेकर यांनी स्पष्ट केले.

वोटबॅंक गमावण्याची शिवसेनेला भीती
नाणार प्रकल्प झाला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाखो रोजगार संधी निर्माण होतील. इथला तरुण मुंबईत न जाता गावी स्थायिक होईल. अनेक नवीन कुटुंबे रत्नागिरी-सिंधुदुर्गात येतील. यात शिवसेनेला हक्काची वोट बॅंक गमवावी लागेल. म्हणून शिवसेना आणि त्यांची नेते मंडळी नाणार प्रकल्पाला विरोध करत असल्याची भूमिका अतुल काळसेकर यांनी मांडली.

जठार पक्ष विरोधात जाणार नाहीत
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे नाणार प्रकल्पाच्या मुद्‌द्‌यावर अपक्ष निवडणूक लढणार आहेत. तसे त्यांनी जाहीर केले आहे. याबाबत प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून आपली भूमिका काय? असा प्रश्न केला असता, श्री.जठार हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते पक्ष विरोधात कुठलेही कृत्य करणार नाहीत. तसेच त्यांच्या निवडणूक लढण्याबाबत पक्षपातळीवर चर्चा होईल असे श्री काळसेकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com