वर्षा पर्यटनाच्या आनंदावर विरजण नाही

वर्षा पर्यटनाच्या आनंदावर विरजण नाही

रत्नागिरी - सवतकडा धबधब्यावर झालेल्या दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील सात धबधब्यांवर अतिवृष्टीवेळी मज्जाव करण्यात आला. वर्षा पर्यटनावर विरजण घालण्याचा कोणताही हेतू नाही. आम्ही ३१ तारखेपर्यंत १४४ कलम लागू केले आहे. या दरम्यान हुल्लडबाजी, मद्यपान, धबधब्याच्या थेट प्रवाहात उतरणे, पोहण्यास बंदी घातली आहे. पर्यटकांनी धबधब्यावरील सुरक्षित पर्यटनाचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन निवासी जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना केले.

ते म्हणाले, सवतकडा (ता. राजापूर) येथील घटनेमध्ये दैव बलवत्तर म्हणून १३ जण वाचले. स्थानिक आणि रत्नदुर्ग माउंटेनिअर्सने धाडसी रेस्क्‍यू ऑपरेशन करून सुरक्षित बाहेर काढले. उत्साहाच्या भरात धबधब्याखाली भिजण्याचा आणि पोहण्याचा आनंद घेतात. पंचक्रोशीत झालेल्या पावसाचा अंदाज येत नाही. 

डोंगराळ भागातील सर्वत्र पाणी आल्याने धबधब्याच्या प्रवाहात अचानक वाढ होते. त्या पाण्याला वेगळा दाब आणि करंट असतो. उत्साहाच्या भरात याकडे दुर्लक्ष होऊन हा उत्साह जिवावर बेतण्याची शक्‍यता असते. हे टाळण्यासाठी अतिवृष्टीच्या काळात जिल्ह्यातील महत्त्वाच्या सात धबधब्यांवर बंदी घालण्यात आली. पावसाचा जोर पाहता आम्ही आणखी एक निर्णय घेतला आहे. ३१ जुलैपर्यंत या भागात १४४ कलम लागू केले. 

या दरम्यान हुल्लडबाजी, मद्यपान करणे आणि थेट प्रवाहात पोहण्यासाठी जाण्यास बंदी घातली आहे. धबधब्याच्या शंभर मीटर अंतरापर्यंत ही बंदी असेल. पर्यटकांनी वर्षा पर्यटनाचा दिलखुलास आनंद घ्यावा. प्रशासनाने त्याला कुठेही बंदी घातलेली नाही. मात्र हे पर्यटन सुरक्षित असेल तर आनंद आणखी द्विगुणित होईल. 

सात धबधब्यांवर बंदी
सवतकडा, निवळी, उक्षी, धूतपापेश्‍वर, पानवल, सवतसडा, मार्लेश्‍वर या सात धबधब्यांवर बंदी आदेश लागू केला आहे. कायद्याचे उल्लंघन न करता सुरक्षित पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com