भाजप जिल्हा उपाध्यक्ष म्हणाले, आयत्या बिळावर नागोबा बनण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

BJP District Vic Presiednt Ranjeet Desai Comment On Shivsena
BJP District Vic Presiednt Ranjeet Desai Comment On Shivsena

कुडाळ (सिंधुदुर्ग ) - आयत्या बिळावर नागोबा बनण्याचा केविलवाणा प्रयत्न शिवसेनेने करू नये, असा इशारा भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. 

श्री. देसाई यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे, आनंद शिरवलकर, नगरसेवक राकेश कांदे, बंड्या सावंत, सुनील बांदेकर, राजा धुरी आदी उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, ""राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चौपदरीकरणाच्या भूसंपादनाच्या 130 कोटी रुपयांचा निधी हा केंद्राच्या माध्यमातून राज्य सरकारकडे वर्ग केला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाईची ही रक्कम केंद्राने दिली आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खासदार नारायण राणे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पाठपुरावा केला होता व त्यांची भेट घेऊन या विषयाचे गांभीर्य देखील त्यांच्यासमोर मांडले होते. त्यामुळे केंद्र शासनाने हा निधी राज्य शासनाकडे वर्ग केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते व गटनेते नागेंद्र परब यांनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये. केवळ पत्रकार परिषद घेऊन किंवा केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देतानाचे फोटो प्रसिद्ध करून एवढा मोठा निधी मिळत नाही तर त्याकरता योग्य तो पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे. सरकारदरबारी वजन असणे देखील आवश्‍यक आहे.'' 

ते म्हणाले, ""खासदार विनायक राऊत हे गेली सहा वर्षे मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीत कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही किंवा विकासाचे कोणतेही लक्षणीय काम केलेले नाही. चार वर्षापूर्वी थाटामाटात भूमिपूजन केलेला भंगसाळ नदीवरील बंधारा अद्यापपर्यंत अपूर्ण आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी पाहणी करून हे अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून पडते यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रशासनावर अंकुश कसा ठेवावा हे पालकमंत्र्यांनी दाखवून दिले आहे. म्हणजेच स्थानिक आमदार वैभव नाईक व तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांचा प्रशासनावर अंकुश नव्हता असेच पडतेंना सुचवायचे आहे. त्याचमुळे पक्षश्रेष्ठींनी जिल्ह्यात 2 आमदार असताना देखील बाहेरील जिल्ह्यातील आमदारांकडे या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवले आहे. स्वतःच्याच पक्षाच्या आमदार व माजी पालकमंत्री यांच्या अकार्यक्षमतेबद्दल बोलणाऱ्या संजय पडते यांचे कौतुकच करायला पाहिजे.'' 

आमदार नितेश राणे यांनी फोंडा बाजारपेठेत लोकांना सोशल डिस्टन्ससिंगचे महत्व सांगण्याकरता फेरी काढली होती. यावर देखील पडते यांनी टीका केली होती. नितेश राणे हे त्या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी मतदारसंघात जनजागृती करणे हे त्यांचे कर्तव्यच आहे; मात्र पालकमंत्र्यांच्या ताफ्यामागून आपली गाडी लावून सोशल डिस्टन्ससिंगचे सर्व नियम पायदळी तुडवून फोटोमध्ये येण्याकरता धडपड करणाऱ्या पडते यांनी पहिले आत्मपरीक्षण करावे. जिल्हा प्रशासनाच्या महत्त्वाच्या आढावा बैठकीमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोकाटपणे वावरत आहेत. त्यामुळे दुसऱ्याला सल्ला देण्यापेक्षा स्वतः आचरण करावे. 

- रणजित देसाई
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com