विनायक राऊत यांना प्रमोद जठार यांनी दिले 'हे' आव्हान

BJP Leader Pramod Jathar Criticism on MP Vinayak Raut
BJP Leader Pramod Jathar Criticism on MP Vinayak Raut

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - भाजपच्या मतांवर निवडून आलेल्या खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेना प्रवक्ते संजय राऊत हे सातत्याने भाजप पक्षावर टीका करत आहेत. त्यांना भाजपचा एवढा तिटकारा असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे दिले. तीन पैशाचा तमाशा असलेले तीन पक्षांचे सरकार जर अस्तित्वात आलेच तर ते तीन वर्ष तरी टिकवून दाखवावे, असेही आव्हान जठार यांनी दिले.

भाजप जिल्हाध्यक्ष जठार यांनी येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी वाहतूक आघाडीचे शिशिर परुळेकर, सुरेश सावंत आदी उपस्थित होते. जठार म्हणाले, "खासदार संजय राऊत हे भाजप बद्दल जेवढे वाईट बोलता येईल तेवढे बोलत आहेत. भाजप एवढीच वाईट होत तर त्यांनी महायुती का केली? लोकसभा लढताना शिवसेनेला युतीची गरज का वाटली? शिवसेनेला भाजपची मुळीच गरज नसेल शिवसेनेच्या खासदारांनी राजीनामे द्यावेत आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावे.''

भाजपची दोन लाख मते

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात खासदार विनायक राऊत यांना भाजपची दोन लाख मते मिळाली होती. त्यामुळे भाजपवर टीका करण्याचा अधिकार राऊत यांना नाही. तसेच जर त्यांना टीका करायची असेल तर त्यांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यायला हवा. पुन्हा निवडून येण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारायला हवे, असे जठार म्हणाले.

एनडीए सोडलात तर जागेसाठी आग्रही का?

लोकसभेत शिवसेनेच्या खासदारांना मागील रांगेतील खुर्च्या देण्यात आल्या. यावरून शिवसेनेची नेतेमंडळी भाजपवर टीका करत आहेत; पण शिवसेनेचे मंत्री अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्ष स्वतःहून एनडीए या घटकपक्षांतून बाहेर पडला असेल तर शिवसेनेचे सदस्य पूर्वीच्या आसनांसाठी आग्रही का आहेत? ते विरोधी पक्षात असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे त्यांना मागील आसने मिळाली तर त्यात चूक काय? असा प्रश्‍न जठार यांनी केला.

शिवसेना आमदारांना अस्तित्वाची भीती

स्वतः किंवा मुलाला मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कॉंग्रेस - राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन करायला तयार झाले आहेत; पण शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी निवडून येण्यासाठी कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात संघर्ष केला आहे. आता याच कॉंग्रेस - राष्ट्रवादीसोबत सरकार चालवायचे म्हणजे आपले अस्तित्वच संपुष्टात येईल, अशी भीती शिवसेनेच्या अनेक आमदारांना वाटत असल्याचे ही श्री. जठार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com