अतिवृष्टीने काजू बागांचे नुकसान; शास्त्रज्ञांकडून होणार पाहणी 

अतिवृष्टीने काजू बागांचे नुकसान; शास्त्रज्ञांकडून होणार पाहणी 

सावंतवाडी - दाभिल सरमळे हा रस्ता अतिवृष्टीत नाहीतर निकृष्ट कामामुळे पहिल्याच पावसात वाहून गेला आहे. त्याला पूरबाधीत नुकसानीत पकडून संबंधित ठेकेदाराच्या बोगस कामाला अभय न देता, या कामाची चौकशी लावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य रवींद्र मडगावकर यांनी आज येथील आयोजित पंचायत समितीच्या बैठकीत केली.

अतिवृष्टीमुळे काजू कलमांची झालेली नुकसानी लक्षात घेता सह्याद्री पट्ट्यातील बागायतीचे कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांकडून पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती कृषी अधिकारी आर. बी. चौगुले यांनी सभागृहाला दिली. 
येथील पंचायत समितीची मासिक बैठक सभापती पंकज पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे झाली.

यावेळी उपसभापती संदीप नेमळेकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले आदी उपस्थित होते. बैठकीत सुरवातीला विविध खात्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीबाबत सदस्याने आवाज उठवला. यामध्ये भात पीक नुकसानीचा पंचनामा करताना तो प्रत्यक्ष शेतात जाऊन न करता कार्यालयात बसून करण्यात आला असल्याचा आरोप सदस्यांनी केला. पंचनामा हा योग्य नसून झालेल्या नुकसानीचा योग्य पंचनामा करण्यात यावा व जेवढे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे, तितकी नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात यावी, असा ठराव सदस्य श्री. मडगावकर यांनी मांडला. तर तालुका कृषीकडून शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून शेतकरी लाभापासून वंचित राहत आहे, असा आरोप सदस्य श्रीकृष्ण सावंत यांनी केला. 

कृषी अधिकारी चौगुले यांनी भात शेती पंचनामा प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. हा पंचनामा तलाठी, ग्रामसेवक, सरपंच व कृषी सहाय्यक या सर्वांकडून होत असतो; मात्र क्षेत्र नोंदीची माहिती कृषी अधिकाऱ्यांना माहीत नसल्याने यासंदर्भात तलाठ्यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. 
गणेश चतुर्थी सण लक्षात घेता जिल्हा परिषद बांधकाम ने रस्त्यावरील खड्डे बुजवावे तसेच वाहून गेलेले रस्ते दुरुस्त करावेत. सणाच्या काळात एसटी बस गाड्या खड्डे अभावी बंद पडू नयेत, अशा सूचना सभापती पंकज पेडणेकर यांनी बांधकामचे अमित कल्याणकर यांना दिले.

सदस्य मडगावकर यांनी दाभिल सरमळे रस्ता निकृष्ट कामामुळे पहिल्याच पावसात वाहून गेला आहे. तो पुर बाधित नुकसानीमध्ये पकडून त्याला पुन्हा निधी दिल्यास ठेकेदाराला फायदा होईल व बोगस कामाला यामुळे एकप्रकारे अभय मिळेल. त्यामुळे या कामाची चौकशी लावावी, अशी मागणी केली. यावेळी हा रस्ता पुरनुकसानीत घेतला नसल्याचे कल्याणकर यांनी स्पष्ट केले. 

बैठकीत ग्रामसेवक संपाबाबत चर्चा झाली. ग्रामसेवकांनी सरपंचांना विश्वासात न घेता कार्यालयीन चाव्या बीडीओकडे सुपूर्द केल्याने सरपंचांच्या अधिकारावर एक प्रकार एकदा आली आहे; मात्र यासंदर्भात तात्काळ तोडगा निघावा, अशी मागणी सदस्याने केली तसेच खातेबदल व सह्यांच्या अधिकाराबाबत विचारणा केली. यावेळी कोणतेही खाते बदल होणार नसून जोपर्यंत शासनस्तरावरून याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत आपण काही सूचना देऊ शकत असल्याचे बीडीओ भोसले त्यांनी सांगितले. 

आयुष्यमान सर्व्हे बोगस 
केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या आयुष्यमान भारत या योजनेच्या संदर्भात गावागावांत करण्यात आलेला सर्व्हे घरात बसून करण्यात आला आहे. यामध्ये गरिबांना सोडून श्रीमंतांना संधी देण्यात आली आहे, असा आरोप सदस्य मळगावकर यांनी करत हा सर्व्हे बोगस असून तो पुन्हा करण्याची मागणी केली. 

कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून... 
सह्याद्री पट्ट्यात शेतकऱ्यांच्या काजूच्या बागा उध्वस्त होत असून अतिवृष्टीमुळे काजूच्या झाडांची पाने पिवळी होऊन गळत आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यावेळी यासंदर्भात दापोली कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून येत्या दोन दिवसात या प्रकाराची पाहणी करण्यात येणार आहे, असे श्री. चौगुले यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com