केसरकर म्हणाले, सतीश सावंत शिवसेनेत आल्यास स्वागतच 

केसरकर म्हणाले, सतीश सावंत शिवसेनेत आल्यास स्वागतच 

वेंगुर्ले - सतीश सावंत यांनी घेतलेला निर्णय हा खरा स्वाभिमानी निर्णय असून, सावंत शिवसेनेत आल्यास त्यांचे स्वागतच आहे. त्यांना योग्य तो मानसन्मान देण्यात येईल. मला उमेदवारी जाहीर झाली आणि दुसऱ्या दिवशी युती जाहीर झाली. जिल्ह्यात तिन्ही जागांवर महायुतीचाच आमदार बसेल. सिंधुदुर्ग भगवामय करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहणार आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री तथा महायुतीचे सावंतवाडी मतदारसंघाचे उमेदवार दीपक केसरकर यांनी दिली. 

महायुतीची घोषणा झाल्यानंतर प्रथमच पालकमंत्री केसरकर यांनी वेंगुर्लेत पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते म्हणाले, ""महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याने नेहमीच चांगल्या गोष्टी घडतात. ज्याप्रमाणे शिवसेनेत चाहते आहेत, तसेच मित्रपक्षात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मी गेली पाच वर्षे सहकारी मंत्री म्हणून काम करीत आहे. यामुळे आता महायुतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील तिन्ही जागा लढण्यासाठी सज्ज आहोत आणि हीच खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली असल्याचे समजतो.'' 

नारायण राणे हे ज्या पद्धतीने लाचारी करीत आहेत हे त्यांच्याच कार्यकर्त्यांना आवडणार नाही. केवळ आपल्या मुलाची आमदारकी शाबूत राहावी. म्हणून आज ते आपल्या कार्यकर्त्यांचा बळी देत आहेत. खऱ्या अर्थाने चांगला निर्णय सतीश सावंत यांनी घेतला आहे. प्रत्येकाला आपलं भवितव्य असतं. ज्यांना जनतेसाठी काम करायचे असते ते कोणाच्याही गुलामगिरीखाली काम करू शकत नाहीत. यामुळे राजीनाम्याचा हा निर्णय खऱ्या स्वाभिमानी व्यक्तीने घेतलेला निर्णय आहे. ही प्रक्रिया आता जिल्ह्यात सुरू झाली असून, राणे म्हणत आहेत, की आपण आता भाजपमध्ये जाऊ. मात्र, यापूर्वी त्यांनी एकदा वळून पाहिलं तर पाठीमागे कार्यकर्ते राहणार नाहीत. राणे हे स्वतःच तारखा जाहीर करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला विचारल्याशिवाय राणेंच्या प्रवेशाबाबत निर्णय घेणार नाहीत. 
सावंत हे एक चांगले व्यक्तिमत्त्व असून, त्यांना निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांनी योग्य निर्णय घेऊन ज्याठिकाणी त्यांचे राजकीय भवितव्य असेल तिथे त्यांनी जावे. सावंत शिवसेनेत आल्यास त्यांचा संपूर्ण मानसन्मान ठेवण्याची जबाबदारी ही आमची सर्वांची असेल, असेही केसरकर म्हणाले. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पडते व वेंगुर्ले तालुका पदाधिकारी उपस्थित होते. 
 
तेलींचा समाचार घेईन - मंत्री 
गुडघ्याला बाशिंग बांधून नवरा होता येत नाही. अपक्ष उमेदवाराला जिल्ह्यातील जनतेने काहीही थारा दिला नाही. राजन तेली यांच्यापेक्षा रवींद्र चव्हाण हे वरिष्ठ आहेत. सर्व कार्यकर्ते हे चव्हाण यांचा शब्द मानतात आणि भाजपचे काम करतात. राजन तेली हे माझ्या मित्रपक्षाचे आहेत. त्यांचा समाचार मी योग्य पद्धतीने घेईन, असे खुले आव्हान पालकमंत्री केसरकर यांनी राजन तेली यांना दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com