जिल्ह्यातील ५० अंगणवाड्या डिजिटल करण्यावर भर - रसाळ

जिल्ह्यातील ५० अंगणवाड्या डिजिटल करण्यावर भर - रसाळ

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्र समाज विकासाचे केंद्र बनावे, यासाठी जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग प्रयत्न करीत आहे. या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघातील एक या प्रमाणे जिल्ह्यातील ५० अंगणवाड्या स्मार्ट, डिजिटल व ‘आयएसओ’ करण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी आजच्या समिती सभेत दिली.

जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीची गेल्या पाच वर्षांच्या कार्यकालातील शेवटची सभा सभापती रत्नप्रभा वळंजू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या वेळी समिती सचिव सोमनाथ रसाळ, समिती सदस्या वंदना किनळेकर, श्रावणी नाईक, निकिता तानावडे, स्नेहलता चोरगे, रुक्‍मिणी कांदळगावकर, कल्पिता मुंज यांच्यासह तालुका 

प्रकल्प अधिकारी, खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
गेली पाच वर्षे महिला व बालविकास समितीचा कारभार सांभाळणाऱ्या समितीचा कार्यकाल संपत आल्याने आज शेवटची सभा संपन्न झाली. या सभेत सभापतींसह सर्वच समिती सदस्यांचा महिला व बालविकास विभागाच्या वतीने सत्कार झाला. या वेळी समिती सचिव सोमनाथ रसाळ यांनी गेली पाच वर्षे समितीचे कामकाज यशस्वीपणे चालविण्यास, तसेच विविध नावीन्यपूर्ण व शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळवून देण्यास सहकार्य केल्याबद्दल सर्व समिती सदस्यांचे धन्यवाद मानले. या समितीच्या माध्यमातून विविध धोरणात्मक निर्णय घेत संजीवन पोषण अभियान, पोषण चळवळ ‘उत्कर्षा’ योजना प्रभावीपणे राबवून जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनाचे काम प्रभावीपणे केल्याने राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषण मुक्तीच्या कामात अग्रक्रमांकावर राहिला असल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्र समाज विकासाचे केंद्र बनावे, यासाठी जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघातील १ या प्रमाणे जिल्ह्यातील ५० अंगणवाड्या स्मार्ट, डिजिटल व आयएसओ करण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती सोमनाथ रसाळ यांनी आजच्या महिला व बालविकास समितीच्या बैठकीत दिली.

कुडाळ तालुक्‍यातील घोडगे-जांभवडे यासारख्या दुर्गम भागातील मुलींना तीन ते चार किलोमीटर पायपीट करत शाळेत जावे लागते. अशा मुलींना सायकल देणे आवश्‍यक असून, महिला बालविकास विभागाला मिळणारा ८० हजार रुपयांपर्यंतचा वाढीव निधी दुर्गम भागातील मुलींना सायकल वाटप योजनेवर खर्च करावा, असे आदेश सभापती रत्नप्रभा वळंजू यांनी सभेत दिले.

चालू आर्थिक बजेटमध्ये २ लाख १८ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती; मात्र गेल्या वर्षभरात दौऱ्याचे आयोजन करूनही नियोजित दौरा होऊ शकला नाही. त्यामुळे दौऱ्यासाठीचा अखर्चित राहणारा निधी एमएससीआयटीसारख्या प्रशिक्षण योजनेवर खर्च करण्यात यावा, असा ठराव आजच्या महिला व बालविकास समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

सर्वांचेच डोळे पाणावले...
जिल्हा परिषद महिला व बालविकासच्या विद्यमान सभापतींसह समिती सदस्यांची आजची शेवटची सभा असल्याने सभेच्या समारोपावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांचे डोळे पाणावले. या कालावधीत जे सभागृहात घडले ते योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी होते. तरी गेल्या पाच वर्षांत प्रशासनाकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल सर्वच सदस्यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com