चिपळूण - बदलत्या वातावरणामुळे मच्छीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे बाजारात मच्छीचा तुटवडा जाणवत असून आवक घटल्याने माशांच्या किमतीवर परिणाम झाला आहे. चिपळुणात मासळी महागली आहे. काही माशांच्या किमती दुप्पट झाल्याने खवय्यांना तोंडाला आवर घालावा लागत आहे.
चिपळूण हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. दापोली, गुहागर, रत्नागिरी येथील ताजी मासळी विक्रीसाठी बाजारात आणली जाते. सध्या कडाक्याची थंडी पडल्यामुळे मच्छीमारांना मासळी कमी मिळत आहे. किनारी भागातील मासळी खोल समुद्राकडे वळते. अनेक मच्छीमारांनी नौका किनार्यावर नांगरून ठेवलेल्या आहेत.
मच्छीच मिळत नसल्याने बाजारावर त्याचा परिणाम होत आहे. हिवाळ्यात मासळीला प्रचंड मागणी असते. किरकोळ विक्रेते बाजारात विकण्यासाठी मोठ्या दलालांकडून मासळी खरेदी करतात. उत्पादनच घटल्याने किरकोळ खरेदीचे दर चढे आहेत. त्यामुळे मासे विकणारे ग्राहकांना मासळी विकताना दर चढवून सांगत आहेत. नियमित दरांपेक्षा सध्या 200 ते 300 रुपयांनी वधारले आहेत. पापलेट, सुरमईला खवय्यांची मागणीही अधिक असल्याने त्याचे दर एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत आहेत.
हीच परिस्थिती रत्नागिरी, हर्णैतील बंदरांवरही दिसून येते. लाखो रुपयांचे इंधन घालून मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. मासळी मिळत नसल्याने मच्छीमारांना मोठा फटका बसला आहे.
माशांचे वाढलेले दर
मासे आधीचे भाव आताचे भाव
पापलेट वाटा 500-1000 700- 1200
सुरमई 500- 800 700- 1000
वाव 400- 600 600- 1000
बोंबिल वाटा 100-150 150-300
हलवा 200-300 300-600
हर्णै येथून मासळी आणून चिपळुणात माशांची विक्री करते. मच्छीमार मासेमारीसाठी खोल समुद्रात जातात तरीही मासळी मिळत नाही. म्हणून हर्णै बंदरात मासळी कमी मिळत आहे. त्यामुळेच मासळीच्या किमती वाढल्या आहेत.
- मीनाक्षी पाटील, मासळी विक्रेत्या, चिपळूण
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.