नारायण राणे यांना "त्या' पराभवाची सल कायम 

नारायण राणे यांना "त्या' पराभवाची सल कायम 

मालवण - वैभव नाईक सारख्या नवख्या उमेदवाराकडून 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या मला पराभव स्वीकारावा लागला, ही सल मनात कायम आहे. हा पराभव मी कधीही विसरणार नाही; मात्र येत्या निवडणुकीत या मतदार संघातून मला 80 ते 85 टक्के मतदान व्हायला हवे. ही सुवर्णसंधी दवडल्यास मालवण मागासलेले राहील. त्यामुळे या दृष्टिकोनातून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उद्यापासूनच कामाला लागा, असे सूचना स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष, खासदार नारायण राणे यांनी आज येथे दिल्या. 

वैभवला ते कळले नाही.... 
मालवण पर्यटन तालुका असल्याने येथील तरुणांना रोजगार मिळण्याबरोबरच जिल्ह्याचा आर्थिकदृष्ट्‌या कायापालट करण्यासाठी सी-वर्ल्ड प्रकल्प आणला; मात्र त्याला विरोध झाला. हा प्रकल्प झाला असता तर मोठे परिवर्तन झाले असते. रोजगार मिळाला असता; मात्र वैभवला ते कळले नाही आणि आयुष्यात कधी कळणारही नाही, असे श्री. राणे यांनी बोलून दाखवले. 

येथील दैवज्ञभवन सभागृहात तालुक्‍यातील स्वाभिमानचे आजी, माजी पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, सरपंच, उपसरपंच यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सभापती सोनाली कोदे, बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस, जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर, सरोज परब, कृष्णनाथ तांडेल, सुहास हडकर, राजन सरमळकर, अशोक तोडणकर, अशोक बागवे, महेश जावकर, लीलाधर पराडकर, भाई मांजरेकर आदी उपस्थित होते. 

श्री. राणे म्हणाले, ""विधानसभेची आचारसंहितेस एक महिना उरला आहे. मालवणबद्दल माझ्या मनात आदर व अभिमान आहे. याच मतदार संघातून सहावेळा आमदार झालो. मागील निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागला. गेल्या पाच वर्षात पालकमंत्री, खासदार, आमदार आपला नाही. मी आज राज्यसभा खासदार आहे, हे असं होतं का? याचा जनतेने विचार करावा. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. सिंधुदुर्ग जिल्हा दीड लाखाचे मताधिक्‍य मिळवून देईल, असे वाटले होते. मला 1990 पासून 80 टक्के मते मिळायची. नीलेश राणेंना 35 टक्के मते कमी मिळाली. त्यामुळे मी आमदार, मंत्री असताना कुठे कमी पडलो का ?'' 

ते म्हणाले, ""पावसापूर्वी झालेल्या रस्त्यांची अवस्था बघा. मी आणलेले प्रकल्प बंद केले. गेल्या पाच वर्षाच्या काळात रोजगाराचा एखादा प्रकल्प आला का? रस्ते, पाणी, वीज, आरोग्य याबाबत कोणी काहीही बोलत नाही. पूरपरिस्थितीमुळे विहीरींमधील पाणी दूषित झाले आहे. गेल्या पाच वर्षात जिल्ह्याची, मतदार संघाची अधोगती झाली आहे. मच्छीमारांची सध्या अवस्था बिकट असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मला पुढारी मानत असाल तर माझा संपूर्ण समाज उपासमारीत असता कामा नये.'' 

ते पुढे म्हणाले, ""जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी स्वाभिमान पक्षाच्यावतीने मदत करण्यात आली आहे; मात्र ती पुरेशी नाही. त्यामुळे अधिक मदत करण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून निधी गोळा करण्याचे काम केले जाईल. देवबाग बंधाऱ्यासंदर्भात छेडलेल्या उपोषण आंदोलनास आपला पाठिंबा आहे. कोणत्याही विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही.'' 

तुम्हाला हवा तोच उमेदवार देणार 
मागील विधानसभा निवडणुकीतील 45 टक्‍क्‍यांची मते 80 टक्‍क्‍यांवर न्यायला हवी. त्यामुळे लोकांपर्यंत पोहचा. जिल्ह्यात आमची ताकद जास्त आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींवर आमचे वर्चस्व आहे. फक्त आमदार, खासदार आमचे नाहीत. त्यामुळे सर्वांनी उद्यापासूनच कामाला लागा. चर्चा नको. तुम्हाला हवा असलेला उमेदवार देणार आहे. मालवणमधून मला 50 हजार मते मिळायला हवी, यादृष्टीकोनातून प्रयत्न करा. 

राणेंच्या आत्मचरित्राचे 16 ला प्रकाशन 
मी लिहिलेल्या आत्मचरित्राचे प्रकाशन 16 ऑगस्टला यशवंतराव प्रतिष्ठान मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिक्षणमंत्री आशिष शेलार, विनोद तावडे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे श्री. राणे यांनी यावेळी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com