रत्नागिरी : वेगवान वाऱ्याने आज सलग चौथ्या दिवशी मच्छीमारांची निराशा केली. मासेमारीसाठी जाणाऱ्या शंभरपैकी अवघ्या दहाच बोटींना मासळी मिळत असल्याने मोठा फटका बसला आहे. वेगवान वाऱ्यामुळे नौका समुद्रकिनारी नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या वेगवान वाऱ्याने मच्छीमारांची वाट अडवली आहे.
वातावरणातही बदल झाल्याने मासळी खोल समुद्रात गेली आहे. या वर्षी हंगाम सुरू झाल्यानंतर अशी परिस्थिती दुसऱ्यांदा निर्माण झाली आहे. बुधवारी रात्रीपासून वारे वेगाने वाहू लागले.
वाऱ्यामुळे खोल समुद्रात नौका उभ्या राहू शकत नाहीत. उत्पादनच नसल्याने त्याचा फटका मच्छीमारांना बसला आहे. त्याचबरोबर मच्छीचे भावही वधारले आहेत. सुरमई किलोला सातशे रुपये, तर पापलेटही सहाशे ते सातशे रुपयांनी विकले जात आहे. छोट्या नौका समुद्रात नेण्यापेक्षा बंदरातच थांबवणे मच्छीमारांनी पसंत केले आहे.
|