हर्णै बीचवर परदेशी पाहुण्यांची भरारी

दापोलीत तपमान घसरले; पर्यटकांसाठी मेजवानी, बागायतदारही सुखावले
हर्णै बीचवर परदेशी पाहुण्यांची भरारी

हर्णै : मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीतील किमान तापमानात घट झाली. गेले आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे थंडी गायब झाली होती. परंतू गेले दोन दिवस गारठा वाढला असून आज दापोलीत १६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या गारठ्यामुळे आंबा बागायतदार सुखावले असून पर्यटक व्यवसायाला गती मिळणार आहे. थंडीच्या मोसमात मोठ्या संख्यने पर्यंटक येथील किनाऱ्यांवर येणार असल्याने व्यावसायिकही आनंदित आहेत. दरवर्षीप्रमाणे थंडीच्या हंगामात येणारे सीगल पक्षीही किनाऱ्यावर दाखल झाले असून त्यांचे थवे पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.

ऑक्टोबर हीटनंतर नोव्हेंबरपासून थंडीला सुरवात होते. परंतु यावर्षी ऑक्टोबर हीटनंतर पावसाने तोंड वर काढले आणि थंडी गायब झाली होती. खर तर या दिवसांमध्ये थंडी सुरू होऊन आंब्याला मोहोर यायला सुरवात होते. परंतु मध्येच पाऊस आणि कडक उन्हामुळे वातावरण बिघडले. मात्र, दोन ते तीन दिवसांपासून उत्तरेकडील जोरदार वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे गायब झालेली थंडी पुन्हा सुरू झाली आहे.

पर्यटकांना तो आनंद लुटता येणार

दिवाळीमध्ये चांगली थंडी असते. त्यामुळे सुट्टीमध्ये पर्यटक दापोलीत फिरायला येतात. यावर्षी वातावरणात बदलामुळे थंडीची मज्जा पर्यटकांना घेता आली नाही. मात्र, आता थंडी पडू लागल्याने विकेंडला मुंबई, पुणे येथून येणाऱ्या पर्यटकांना थंडीचा आनंद लुटता येणार आहे.

सीगल पक्षी थव्याने दाखल

गेले दोन दिवस तालुक्यातील बीचवर पर्यटकांनी भरपूर गर्दी आहे. कोकणात थंडी सुरू झाली की परदेशी पाहुणे सीगल पक्षी थव्याने दाखल होतात. त्याप्रमाणे यारर्षीही परदेशी पाहुणे रविवारी सकाळी हर्णैच्या किनाऱ्यावर दाखल झाले. मोठ्या संख्येने येणाऱ्या पाहुण्यांचे थवे पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली आहे.

सकाळी आणि सायंकाळनंतर थंडी

पहिल्यांदाच मिनी महाबळेश्वर म्हणून गणल्या जाणाऱ्या दापोलीचे किमान तापमान १६.८ अंशावर आले. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळनंतर थंडी वाजू लागली आहे. या थंडीमुळे बागायतदारही सुखावला आहे. अशीच थंडी सुरू राहिली तर यावर्षी आंब्याला चांगला मोहोर येऊन पीक चांगले मिळू शकेल.

तर चांगले उत्पन्नः नरवणकर

दोन वर्षांपूर्वी दापोलीच्या किनारपट्टीला निसर्ग वादळाचा फटका बसला होता. सर्वच बागायतदारांचे भरपूर नुकसान झाले. त्यामुळे गेल्यावर्षी काहीच उत्पन्न मिळाले नाही. वादळाअगोदर एक वर्ष आंब्याच्या कलमांचे उत्पन्न नाही मिळाले, तर पुढच्या वर्षी हमखास उत्पन्न मिळणार हा विश्वास आणि नियमितपणा होता. परंतु वादळामुळे हादरलेल्या झाडांना यावर्षी पोषक वातावरण मिळालं तर आंब्याचं पीक चांगल्याप्रकारे येण्याची शक्यता आहे. दाभोळ, कोळथरे आदी किनारपट्टीच्या भागामध्ये आंबा कलमांना मोहोर यायला सुरवात झाली आहे. तसेच बाणकोटमधून यावर्षी आंब्याच्या पेट्या बाजारात गेल्या आहेत. त्यामुळे पोषक वातावरण असल्याने निसर्गाची कृपा राहिली तर यावर्षी चांगले पीक येऊ शकते, असे हर्णै येथील आंबा बागायतदार उदय नरवणकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com