पुन्हा एकदा कहर..काय झालीय सिंधुदुर्गची स्थिती? वाचा...

heavy rain konkan sindhudurg
heavy rain konkan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेक घरांना पुराचा फटका बसला. जिल्ह्यात काही ठिकाणी वाहतूक ठप्प होती. बांदा, तळवडे, कुडाळ आदी भागांत पाणी घुसण्याचे प्रकार घडले. सरंबळ येथील डोंगर खचला असून तेथील पाच घरे धोक्‍याच्या छायेत आहेत. एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्याला पूरस्थितीची चाहूल लागली आहे.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने काल रात्रीपासून पुन्हा एकदा कहर माजविला. मध्यरात्रीपासून या पावसाने आणखीनच जोर धरला. अविरतपणे हा पाऊस कोसळत राहिला. आज दुपारपर्यंत हा पाऊस कोसळत असल्याने याचा परिणाम जनजीवनावर व वाहतूक व्यवस्थेवर दिसून आला.

जिल्ह्यातील अनेक गावातील ठिकाणची वाहतूक व्यवस्था ठप्प होती. अनेक गावांमधील संपर्क तुटला. वाड्या वस्तीतील काही गावांमध्ये घराभोवती पाण्याने वेढा दिला होता. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले, पुराच्या पाण्याने दुकानातील साहित्याचे नुकसान झाले. 

वेंगुर्ले आणि सावंतवाडी तालुक्‍याला जोडणाऱ्या होडावडेतील पुलावर पुन्हा पाणी आल्याने दोन्ही तालुक्‍यातील संपर्क तुटला. तुळस होडावडेमार्गे जाणारे वाहनधारक मठ व आडेली मार्गे वेंगुर्लेला रवाना झाले. तालुक्‍यातील दांडेली या पुलावर पाणी आल्याने तळवणे आरोंदा तसेच आरोस या भागातून जाणारे वाहनधारक मळेवाड कोंडूरेमार्गे मार्गस्थ झाले होते. 

तेरेखोल नदीला पुरसदृश स्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी शहरातील आळवाडी बाजारपेठेत घुसले. यामुळे येथील व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. नदीची पातळी वाढत असल्याने ग्रामपंचायत, महसूल, पोलिस प्रशासनाने आळवाडी येथे नुकसानीची पाहणी करत व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. बांदा-सावंतवाडी रस्त्यावर इन्सुली-डोबाचीशेळ येथे पाणी आल्याने वाहतूक बंद होती. 

माणगाव (ता.कुडाळ) येथील आंबेरी पूलावर आज पुन्हा पाणी आल्याने वाहतूक ठप्प होती. सरंबळ येथील डोंगर खचला असून तेथील पाच घरे धोक्‍याच्या छायेत आहेत. शहरातील आंबेडकर नगराला पाण्याने वेढले आहे. ग्रामीण भागातही ठिकठिकाणी पुलावर पाणी आले होते. 

तळवडे बाजारपेठ पूर्ण पाण्याखाली गेली. यात व्यापारी बांधव याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तळवडे बाजारपेठेतील निम्म्याहून अधिक दुकानात पुराचे पाणी शिरून व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले. 

24 तासांत जिल्ह्यात झालेल्या पावसाने सावंतवाडी, वेंगुर्ले आणि कुडाळ या तिन तालुक्‍यांना अक्षरशः झोडपून काढले. वेंगुर्ले तालुक्‍यात सर्वाधिक 141 मि.मी. पावसाची नोंद झाली तर वैभववाडी आणि दोडामार्ग याठिकाणी सरींचा शिडकावा झाला. मालवण, कणकवली आणि देवगड या तीन तालुक्‍यांत काही ठिकाणी कमी व मध्यम स्वरूपाच्या पाऊस झाला.

जिल्ह्यातील पाऊस मि.मी.मध्ये असा ः दोडामार्ग - 33. सावंतवाडी - 134, वेंगुर्ले - 141, कुडाळ - 115, मालवण - 72, कणकवली - 40, देवगड - 48, वैभववाडी - 10 एकूण 599 मिलिमीटर एवढा पाऊस झाला असून 74.875 एवढी सरासरी नोंद करण्यात आली आहे. 

देवगडात संततधार 
तालुक्‍यात पावसाने आज पुन्हा जोर धरला. 24 तासांत आज सकाळपर्यंत येथे 48 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली. शनिवारी रात्रीपासून संततधार सुरू होती. आज दुपारीही येथे जोराचा पाऊस झाला. 

संपादन ः राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com