‘ईडी’च्या भीतीने राणे भाजपच्या वाटेवर - वैभव नाईक

‘ईडी’च्या भीतीने राणे भाजपच्या वाटेवर - वैभव नाईक

कणकवली - ‘ईडी’कडून नोटीस आल्यानंतर कारवाई होणार या भीतीने नारायण राणेंकडून भाजप प्रवेशाची तयारी सुरू आहे. याखेरीज भविष्यात काँग्रेस सत्तेवर येऊ शकत नाही आणि राणे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. त्यामुळे स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी ते सत्ताधारी पक्षात जात आहेत, असा आरोप करून त्यांच्या जाण्याचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे आमदार वैभव नाईक आज येथे म्हणाले.

येथील विजय भवनमध्ये आमदार नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘‘बारा वर्षांपूर्वी नारायण राणेंनी शिवसेना पक्ष सोडला होता. त्यानंतर काँग्रेस पक्षाने राणेंना मंत्रिपदे, मुलांना खासदारकी आणि आमदारकी दिली. 

राणेंना कुडाळ आणि बांद्रा येथील निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. तरीही त्यांना विधान परिषदेसाठी आमदारकी देण्यात आली. गटनेतेपददेखील देण्यात आले. तरीही त्यांची सत्ताधारी पक्षात जाण्याची धडपड थांबलेली नाही.

राणेंना ईडीकडून चौकशीची नोटीस आलेली आहे; परंतु ते अद्याप या चौकशीला सामोरे गेलेले नाहीत. ही चौकशी टाळण्यासाठीच ते आता सत्ताधारी पक्षाचा आश्रय शोधत आहेत; मात्र राणे भाजपमध्ये गेले तरी काँग्रेसचे मूळ कार्यकर्ते तसेच अनेक समर्थक त्यांच्यासोबत जाणार नाहीत. याउलट अनेक राणे समर्थक शिवसेनेत दाखल होणार आहेत.

सिंधुदुर्गात तसेच राज्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद मजबूत आहे. त्यामुळे राणे भाजपमध्ये गेले तरी राजकीय चित्र फारसे बदलणार नाही. राणे काँग्रेसमध्ये असतानाही त्यांना माझ्याकडून पराभव पत्करावा लागला. लोकसभा निवडणुकीतही नीलेश राणेंना पराभव पत्करावा लागला. राणे भाजपमध्ये गेले तरी भविष्यातील निवडणुकांत शिवसेनाच स्वबळावर निवडून येईल.’’ या वेळी युवासेना तालुकाप्रमुख राजू राठोड, भास्कर राणे, संजय ढेकणे, महेश देसाई, आनंद मर्गज, भूषण परुळेकर, बाळू पारकर, सुनील पारकर आदी उपस्थित होते.

राणेंची नाराजी कशासाठी?
शिवसेना सत्तेत येणार नाही, असे दिसताच शिवसेनेने दिलेले विरोधी पक्षनेते सोडून राणे २००५ मध्ये काँग्रेसवासी झाले. त्यानंतर बंड करूनदेखील काँग्रेसने राणेंना मंत्रिपदे दिली. मुलांना खासदारकी, आमदारकी दिली. राणेंना विधान परिषदेवर घेतले. विधान परिषदेचे गटनेतेपद दिले. एवढी पदे दिली असतानाही राणे काँग्रेसवर नाराज का? या प्रश्‍नाचीही उत्तरे त्यांनी कार्यकर्त्यांना आणि जनतेला द्यावीत, असे श्री. नाईक म्हणाले.

त्यांचा राणे विरोध कायम राहणार का?
माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या कार्यपद्धतीला कंटाळून अनेकजण भाजपसह इतर पक्षात गेले आहेत. आता राणे भाजपमध्ये असले तर भाजपवासी झालेले राजन तेली, संदेश पारकर यांचा राणेंना विरोध कायम राहणार का, असा प्रश्‍न श्री. नाईक यांनी उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com